हिंगोली जिल्ह्यात सध्या मोठ्या राजकीय हालचाली सुरू असून, काँग्रेसचा एक प्रभावी चेहरा भाजपच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे. पुढील काही दिवसांत संबंधित नेत्यासह कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित नेत्याने आपल्या काही मोजक्या, विश्वासू कार्यकर्त्यांना तातडीने मुंबईत येण्याचे संदेश दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ही व्यक्ती आमदार डॉ. प्रज्ञा सातव असल्याचे बोलले जात आहे. प्रज्ञा सातव यांच्याकडे विधान परिषद आमदारकीचा २०३० पर्यंतचा कार्यकाळ आहे. भाजप प्रवेशाआधीच त्या आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
कोण आहेत डॉ. प्रज्ञा सातव?
गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांना २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरू असतानाच आजारपणामुळे निधन झालं. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष आहेत. सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती.
राजीव सातव हे २०१४ ते २०१९ दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. २०१९ नंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती. २०१७ मध्ये गुजरात निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने सातव यांना दिली होती. त्यावेळी काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपच्या नाकी नऊ आणलं होतं. भाजपला काठावरचं बहुमत मिळालं होतं. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे स्थान निर्माण केले होते. ते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते.
प्रज्ञा सातव या पहिल्यांदा २०२१ मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या. २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. सातव कुटुंब हे काँग्रेसच्या विचारांचे घराणं समजलं जातं. मात्र, प्रज्ञा सातव या भाजपात प्रवेश करत असल्याने काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे समजलं जात आहे.
