ही घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंडदी गावात घडली. दोन सख्ख्या मुलांनीच मालमत्तेच्या वादातून आई वडिलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. शनिवारी घरामध्ये वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता मुलांनीच ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.
मृत महादेव बाळ्या कांबळे (९५) व त्यांच्या पत्नी विठाबाई महादेव कांबळे (८३) असं मयत दाम्पत्याचं नाव आहे. ते मेंदडी गावातील रहिवासी होते. त्यांची दोन मुले नरेश महादेव कांबळे (६३) चंद्रकांत महादेव कांबळे (६०) ही वृद्ध आईवडिलांना घरखर्चासाठी पैसे देत नसल्याने, आईवडिलांनी त्यांना घरात येण्यास बंदी घातली होती. त्याचवेळी मालमत्ता आईवडिलांच्या नावे होती. त्यामुळे वाटणीवरून आईवडिलांचे व मुलांचे वाद झाले होते.
advertisement
याच वादातून नरेश आणि चंद्रकांत या दोन मुलांनी आईवडिलांची गळा दाबून हत्या केली आणि घरातून पोबारा केला. शनिवारी सायंकाळी घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह ताब्यात घेत तपास केला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, डॉग स्क्वाड व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले. तपासात मुलांनीच हत्या केल्याचं समोर आलं. पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलांना अटक केली आहे.
