मुंबईतील पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज ठाकरेंनी संघटन बांधणीबाबत अत्यंत कडक आणि महत्त्वाचे आदेश दिले आहेत. निवडणुकांना वेळ असला तरी, गाफील न राहता घराघरात पक्ष पोहोचवण्यासाठी राज ठाकरेंनी नव्या रणनीतीवर भर दिला आहे.
प्रत्येक विभागातील ताकद तपासणार
राज ठाकरेंनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना प्रत्येक विभागाचा सखोल आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने काही मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.
advertisement
प्रत्येक विभागातील सक्रिय पदाधिकाऱ्यांची संख्या किती आहे, याचा अचूक डेटा गोळा करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.
पक्षाची खरी ताकद असलेल्या तरुण कार्यकर्त्यांची फळी आणि महिला कार्यकर्त्यांच्या सहभागाबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्यपद्धती कशी आहे? ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत का? याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
रिक्त जागा भरण्यावर लक्ष
मुंबईतील ज्या विभागांमध्ये किंवा प्रभागांमध्ये पक्षाची पदे रिक्त आहेत, तिथे तातडीने सक्षम नियुक्त्या करण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत. "२०२९ ला सत्तेचे समीकरण जुळवायचे असेल, तर पाया मजबूत असणे गरजेचे आहे," असा संदेश त्यांनी या बैठकीतून दिला आहे.
कार्यकर्त्यांना 'ॲक्शन मोड'मध्ये येण्याचे संकेत
राज ठाकरे यांच्या या आदेशामुळे मनसेचे मुंबईतील दिग्गज नेते आणि पदाधिकारी आता मैदानात जोमाने उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटासोबत युती केल्यानंतरही राज यांच्या मनसेला ६ जागांवर विजय मिळाला. तर काही जागांवर निसटता पराभव स्वीकारवा लागला होता.
