घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यास हरभऱ्याच्या फुलांवर, कोवळ्या घाट्यांवर आणि दाण्यांवर थेट परिणाम होतो. अळी घाट्यात छिद्र पाडून आत प्रवेश करते आणि दाणा पोखरते, त्यामुळे घाटे सडतात किंवा गळून पडतात. वेळेत उपाययोजना न केल्यास 30 ते 50 टक्क्यांपर्यंत उत्पादनाचे नुकसान होऊ शकते. तसेच बाजारात विक्रीसाठी दर्जेदार माल मिळत नसल्याने आर्थिक तोटाही सहन करावा लागतो.
advertisement
घाटे अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय कोणते?
हरभरा पिकावरील घाटे अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती अवलंबणे आवश्यक आहे. शेतात फेरोमोन सापळे लावून अळीचे निरीक्षण करावे. सुरुवातीच्या टप्प्यात नीम अर्क किंवा नीम तेलाचा फवारा केल्यास अळीचे नियंत्रण करता येते. अळीची संख्या वाढल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी.
फवारणी संध्याकाळच्या वेळेत करणे अधिक परिणामकारक ठरते. याबरोबरच घाटे अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीनंतर योग्य अंतर ठेवणे, संतुलित खतांचा वापर करणे आणि खतांचा अति मात्रा टाळणे आवश्यक आहे. पीक फुलोऱ्यात आणि घाटे धरण्याच्या अवस्थेत विशेष लक्ष देऊन आठवड्यातून किमान दोन वेळा शेताची पाहणी करावी. रासायनिक फवारणी करताना एकाच औषधाचा वारंवार वापर टाळून कीडनाशकांची आलटून-पालटून फवारणी करावी.





