मतदान यंत्रातील कथित घोळ आणि मतदारयाद्यांवर आक्षेप नोंदवत गेली काही महिने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि महाविकास आघाडीने तीव्र लढा छेडला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सत्याचा मोर्चाचे नियोजन सुरू होते. शनिवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान मोर्चाला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने आजच्या मोर्चाला महत्त्व प्राप्त झाले होते. या मोर्चात ठाकरे बंधू आणि शरद पवार यांनी भाषणे केली.
advertisement
कल्याणमधील जवळपास साडे चार हजार लोकांनी मलबार हिलमध्ये मतदान केले
राज्यातील लाखो लोकांचा वापर दुबार मतदानासाठी होत आहे. कल्याणमधील जवळपास साडे चार हजार लोकांनी मलबार हिलमध्ये मतदान केले, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी या मतदारसंघातील लोकांनी मलबार हिलमध्ये मतदान केल्याचे राज ठाकरे म्हणाले. दुबार मतदानावरून सर्वपक्षीयांचे आक्षेप आहेत मग अशा परिस्थितीतही निवडणूक घेण्याची घाई कशाला करता? मतदारयाद्या स्वच्छ करूनच निवडणूक घ्या, असा आग्रह राज ठाकरे यांनी धरला.
मी आज तुमच्यासाठी पुरावे आणलेत, काढ रे ते कापड!
मतदान याद्यांमध्ये काय घोळ आहेत, हे वरचेवर मी मांडत आलो आहे. परवा दिवशी मतदान यंत्रात काय गडबड केली जातीये, हे मी तुम्हाला दाखवले. आजही मी तुमच्यासाठी पुरावे आणले आहेत. ठेवलेल्या कागदाचे गठ्ठे हे सगळे दुबार मतदार आहेत. तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रात काय गडबड सुरू आहे. सत्ताधारी पक्ष तरीही निवडणुका घ्या असे सांगत आहे. का घ्या निवडणुका? कुणाला काय घाई आहे? जोपर्यंत मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, असे राज ठाकरे म्हणाले.
आमदार भुमरे सांगतो की २० हजार मतदार बाहेरून आणले, २३२ आमदार निवडून आल्यानंतरही महाराष्ट्रात सन्नाटा
पैठणचा सत्ताधारी पक्षातील भुमरे नावाचा आमदार सांगतो की मी २० हजार मतदार बाहेरून आणले. मतदारयादीवर काम करावे, लागेल असे तो स्वत: सांगतो. नवी मुंबईच्या आयुक्तांच्या पत्त्यावर १३० लोक नोंदवले गेले. परवा मी ईव्हीएमबद्दल बोललो. मतदान यंत्राबद्दलची प्रात्याक्षिके दाखवले. उदाहरणच सांगायचे झाले तर २३२ आमदार निवडून आल्यानंतरही महाराष्ट्रात सन्नाटा होता. नेते चिमटे काढून बघत होते की खरंच आपण निवडून आलोय का...? सगळे मतदार गोंधळले होते. सगळीकडे शांतता होती, असे राज ठाकरे म्हणाले.
मतदारयाद्या स्वच्छ झाल्यानंतर निवडणुका घ्याव्यात
जर स्वच्छ वातावरणात निवडणूक होत नसेल तर हा मतदारांचा अपमान नाही का? त्यामुळे मतदारयाद्या स्वच्छ झाल्यानंतर निवडणुका घ्याव्यात त्याशिवाय घाई करू नये, असे राज ठाकरे म्हणाले.
