पहाटेच्या सुमारास दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मुंबईतील बोरिवली येथून खेडमधील सापिर्ली गावाकडं जात होती. शिमगोत्सवाच्या निमित्तानं ग्रामदेवतेच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी सापिर्ली आणि धामणंद परिसरातील भाविक या बसनं प्रवास करत होते. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही बस एनवरे गावाजवळ आली असताना चालकाचं अचानक बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट खड्ड्यात पलटी झाली.
advertisement
ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी बसमधील बहुतांशी प्रवासी झोपलेले होते. त्यामुळे २८ पैकी २५ प्रवासी जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकताच एनवरे येथील स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी अत्यंत तत्परतेनं बचाव कार्य राबवत बसमध्ये अडकलेल्या २८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं.
जखमींवर उपचार सुरू
या भीषण अपघातात एकूण २५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना तातडीनं खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी झालेले सर्व प्रवासी मूळचे सापिर्ली-धामणंद गावातील रहिवासी आहेत.
शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण
कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू असून ग्रामदेवतेच्या पालख्या घरोघरी जात आहेत. आपल्या लाडक्या देवाला भेटण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या बसला अपघात झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
