विमान अपघातात अजित पवारांच्या झालेल्या मृत्यूचा राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला. तो अपघात होता की घातपात, अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली. त्यानंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदांची मालिकाच सुरू केली. दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीए यांच्यातील संबंधांवर भाष्य केलं. काही अधिकारी कंपनीला मदत करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
advertisement
काही अधिकारी कॉन्टॅक्टचा वापर करून रॅकेट चालवतायेत
डीजीसीएमध्ये बसून काही अधिकारी कॉन्टॅक्टचा वापर करून रॅकेट चालवत असल्याचा आरोप करण्यात आला. प्रभावशाली लोकांचा अपघातात हात असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंचा राजीनामा मागितला.
अजित पवारांच्या विमान अपघातावरून संशयाचं धुकं निर्माण झालेलं असतानाच अहमदाबाद विमान अपघातात पायलटनेच इंधनाचा स्वीच बंद केल्याची माहिती मागील आठवड्यात समोर आली होती. त्यामुळे बारामती अपघाताबाबतही अशाच दिशेने तपास व्हावा, याकडे लक्ष वेधण्यात आलं होतं.
पायलटवर कोणाचा दबाव होता का?
पायलटवर कोणाचा दबाव होता का? असा प्रश्नही उपस्थित झाला होता. अजित पवारांनी भंडारा-गोंदिया येथील राईस मिलशी संबंधित फाईलवर शेवटची सही केली होती. त्या फाईलमुळे त्यांना उशीर झाला आणि त्यानंतरच अपघात घडला, असाही दावा करण्यात आला होता. त्यातच अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला वेग आला होती. विलीनीकरणाच्या बैठका आणि अपघात यांचाही संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी पुन्हा एकदा त्यांचे मुद्दे देशासमोर मांडले.
मोदी-शाह-राहुल गांधींना पत्र लिहिणार
रोहित पवारांनी अजित पवारांचा अपघात आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या शंकां संदर्भात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे. एकंदरीतच अजित पवार विमान अपघात प्रकरण आता केवळ अपघातापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. त्यामुळे डीजीसीए आणि नागरी हवाई मंत्रालयावरील आरोपांचं उत्तर कधी दिलं जातं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागंलय.
