संगमनेर : नगरपालिकेच्या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीने सुरुवातीपासूनच आघाडी घेत विजयावर आपली मोहोर उमटवली. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून समितीचे उमेदवार आघाडीवर राहिले, तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे यांनीही मतांची भक्कम आघाडी कायम ठेवत विजय निश्चित केला. या निकालाने संगमनेरच्या राजकारणात थोरात–तांबे गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
advertisement
या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आखलेली रणनीती निर्णायक ठरली. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट)चे आमदार अमोल खताळ, भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. संपूर्ण निवडणूक काळात गाजलेली महायुतीची मोर्चेबांधणी अखेर पराभवाच्या सावटाखाली गेली.
नगरपालिका निवडणुकीची सूत्रे बाळासाहेब थोरात यांनी आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडे सोपवली होती. त्यानुसार सत्यजीत तांबे यांनी ‘संगमनेर सेवा समिती’ या स्वतंत्र व्यासपीठाची स्थापना करत निवडणूक लढवली. विशेष म्हणजे काँग्रेसचे अधिकृत चिन्ह न वापरता, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या राष्ट्रीय पक्षाचे ‘सिंह’ चिन्ह स्वीकारण्यात आले. ही राजकीय खेळी मतदारांना भावली आणि निकालातून तिचे यश स्पष्ट झाले.
प्रचारात दिग्गजांची गर्दी, लढत ठरली प्रतिष्ठेची
निवडणूक प्रचारादरम्यान संगमनेरमध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी महायुतीकडून जोरदार प्रचार केला. त्याचवेळी बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे यांच्या सभांनीही मोठी गर्दी खेचली. संपूर्ण प्रचारकाळात ही लढत ‘वाघ विरुद्ध सिंह’ अशी रंगवली गेली होती. राज्याच्या राजकारणात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
शिंदेंची आश्वासने, थोरातांची प्रतिआक्रमक भूमिका
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोरात कुटुंबावर थेट हल्लाबोल केला. गेली अनेक दशके नगरपरिषद काही मोजक्या लोकांच्या ताब्यात असल्याचा आरोप करत, विकास रखडल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच २०१० पासूनच्या नगरपरिषद कारभाराची चौकशी, संगमनेर एमआयडीसीला गती, महिला व बालकांसाठी रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि पुणे–नाशिक रेल्वे मार्गासंदर्भात आश्वासने देण्यात आली.
या आरोपांना बाळासाहेब थोरात यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. सभांमध्ये शिंदेंच्या आश्वासनांवर टीका करत, निवडणुकीपुरती घोषणाबाजी करणाऱ्यांना जनता आता ओळखते, असा टोला त्यांनी लगावला. अखेर, मतदारांनी थोरात–तांबे गटावर विश्वास टाकत संगमनेरच्या राजकारणात ‘सिंह’च सरस ठरल्याचे स्पष्ट केले.
