विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा इस्लामपूर वाळवा मतदारसंघात पार पडली. या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, आमदार सुमनताई पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी महत्वाचे नेते उपस्थित आहेत.
जयंत पाटील भाषणाला उभे राहताच, पाटीलसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री-जयंत पाटील, अशा घोषणा कार्यकर्ते देऊ लागले. त्यावर जयंत पाटील यांनी टोलेबाजी केली. अरे बाबांनो घोषणा देऊन मुख्यमंत्री होता येत नाही. लै उठाबश्या काढाव्या लागतात, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. त्यावर मंचावर उपस्थित शरद पवारही खळखळून हसले.
advertisement
जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले, निवडणूक जाहीर झाल्यानंतरची ही पहिली सभा आहे. हा प्रारंभ आहे. शिवशंभोचा जागर करत आम्ही संघर्षाला तयार झालो. पक्ष फुटला, तेव्हा प्रचार करायला माणलं मिळतील का? असे आम्हाला हिनवले जायचे पण महाराष्ट्रामध्ये शरद पवार नावाचे वेगळे वलय आहे. प्रत्येक जिल्ह्यात लोकांनी आमचे भरभरून स्वागत केले. आमच्या यात्रेत अनेकांनी रांगा लावल्या. महाराष्ट्रमध्ये चित्र वेगळे आहे. सत्ता बदलण्याचे संकेत आपल्याला मिळतायेत. राष्ट्रवादीला एवढा प्रतिसाद मिळतोय की कुणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्न आमच्यासमोर आहे.
सरकारच्या तिजोरीत पैसे नाही. लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या याआधी नव्हत्या. लोकसभा झाल्यानंतर सगळेच लाडके झाले आहेत. सरकारचे हे पुतना मावशीचे हे प्रेम आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.