सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी २० मार्च रोजी होणार आहे. कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार, याकडे सातारकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा मानस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचे कळते.
महिनाभर पर्यटनावर गेलेले सदस्य थेट निवडणुकीकरीता जिल्हा परिषदेत येणार
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गेल्या महिनाभर पर्यटनावर गेलेले जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी थेट जिल्हा परिषदेत येणार असल्याची माहिती आहे. दगा फटका टाळण्यासाठी दोन्ही पक्षांची रणनीती आखली आहे.
advertisement
सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक चांगलीच गाजली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवत स्वबळावर जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. या निवडणुकीत भाजपचे जयकुमार गोरे यांनी मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका करत त्यांच्या मतदारसंघांमध्ये लक्ष घातले होते. यामुळे साताऱ्यात चांगलेच द्वंद्व पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी-शिवसेनेची पडद्याआडून मैत्री, भाजपविरोधात उघड खेळी
भाजपने या निवडणुकीत २७ जागा जिंकल्या, राष्ट्रवादीने २० जागा तर शिवसेनेने १५ जागांवर विजय मिळवला. मात्र निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने अनेक जागांवर तडजोडी करत एकत्रित निवडणूक लढवण्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे एकत्र राहत अध्यक्षपदी स्वतःचाच उमेदवार निवडून आणतील, अशी चर्चा सातारा जिल्ह्यात आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असे विधान जयकुमार गोरे करत आहेत. त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अलर्ट मोडवर पाहायला मिळतायेत.
