डोंबिवली हे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे होमग्राउंड आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचा महापौर करण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून त्यांनी शिंदे यांचे काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे भाजपात प्रवेश करून घेतले आहेत. त्यातून शिंदे गटात नाराजीचे चित्र आहेत. अशातच शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कडोंमपामध्ये महायुतीचा महापौर असे म्हणत युतीचे संकेत दिले. मात्र, भाजपच्या मनात दुसरं काही आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळाचा नारा बुलंद केला आहे. महायुतीचा घटक असतानाही येथील निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढवण्याची भाजपची तयारी पूर्ण असल्याचे संकेत शनिवारी पक्षाचे कार्यकर्ते दीपेश म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना दिले. दीपेश म्हात्रे यांनी शिंदे गटातून ठाकरे गटात आणि तेथून भाजपात प्रवेश केला. कल्याण-डोंबिवलीची त्यांच्याकडे ठाकरे गटाची जबाबदारी होती.
दीपेश म्हात्रे म्हणाले, “भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची ठाम इच्छा आहे की पालिका निवडणूक स्वबळावर लढवावी. आमची संघटनात्मक ताकद भक्कम आहे. याच बळावर कल्याण–डोंबिवली पालिकेत किमान ७२ नगरसेवक निवडून आणू. त्यामुळे पालिकेवर भाजपचाच महापौर बसवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे त्यांनी म्हटले. पक्ष नेतृत्वाकडून जे आदेश मिळतील त्यानुसारच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कल्याण–डोंबिवली हे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे राजकीय क्षेत्र मानले जाते. त्यामुळे या पालिकेत भाजपने दमदार कामगिरी करून दाखवावी, अशी अपेक्षा स्थानिक संघटनांमध्ये असल्याचे म्हात्रे यांनी नमूद केले. यामुळेच आगामी निवडणुकीत भाजप ‘स्वबळा’ची रणनीती राबवणार का, या चर्चेला उधाण आले आहे. म्हात्रे यांच्या वक्तव्यानंतर महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबतही नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कल्याण–डोंबिवलीतील निवडणूक अधिकच उत्सुकतेची बनली आहे.
