मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वाजता एखतपूर येथील अध्यापक महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, संध्याकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे चौकशी करूनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. हवालदिल झालेल्या वडिलांनी अखेर मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
advertisement
पोलीस आणि कुटुंबीयांनाही मोठा धक्का
पोलीस नाईक रवींद्र बाबर या प्रकरणाचा तपास करत होते. पोलीस तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेत असतानाच, अचानक ही तरुणी तिच्या 27 वर्षीय पतीसोबत पोलीस ठाण्यात हजर झाली. आपण दोघांनी प्रेमसंबंधातून नरसोबावाडी येथे जाऊन धार्मिक विधी पार पाडून लग्न केले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या खुलाशामुळे पोलीस आणि कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला.
पतीसोबत राहण्याचा घेतला निर्णय
तपास अधिकारी रवींद्र बाबर यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार तरुणीचा जबाब नोंदवून घेतला. यावेळी पोलिसांनी तिला तिची इच्छा विचारली असता, तिने वडिलांकडे न जाता आपल्या पतीसोबतच संसार थाटण्याचा ठाम निर्णय व्यक्त केला. तरुणी सज्ञान असल्याने आणि लग्नाचे कायदेशीर पुरावे सादर केल्याने, पोलिसांनी तिला तिच्या पतीसोबत सासरी जाण्याची परवानगी दिली.
