सोलापूर : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी उमेदवार आता मैदानात उतरले आहे. काही ठिकाणी बिनविरोध झाल्यामुळे गुलाल उधळला गेला आहे. त्यातच सोलापूरमधील अनगर नगर परिषद निवडणूक चांगलीच गाजली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे भाजपचे नेते राजन पाटील यांनी विजयी गुलाल उधळला. पण, थिटे यांनी अर्ज बाद प्रकरणी कोर्टात धाव घेण्याची घोषणा केली. मात्र, आता थिटे यांचा अर्जच समोर आला, ज्यामध्ये नेमकी चूक समोर आली आहे.
advertisement
अनगर नगरपंचायत निवडणुकीत नाट्यमयी घडामोडीमुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. भाजपचे नेते राजन पाटील यांचं वर्चस्व असलेल्या अनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांनी आव्हान दिलं आणि नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. पण, दुसऱ्याच दिवशी हा अर्ज बाद झाल्यामुळे खळबळ उडाली होती. पण आता उज्वला थिटे यांच्या उमेदवारी घोषणा पत्रावर सही नसल्याचं समोर आलं आहे.
थिटे यांनी अर्ज भरण्यासाठी मुलगा जयवंत थिटे याला सोबत घेऊन गेल्या होत्या. पण अर्ज भरताना जयवंत थिटे यांच्या नावासमोर सही किंवा अंगठा नसल्याचा रकाना रिकामा आहे. याच कारणामुळे उज्वला थिटे यांचा अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचा अर्ज बाद झाला होता, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली.
दरम्यान, सूचक तपशिलामध्ये उज्वला थिटे यांच्या मुलाची सही नसल्यामुळे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी यावर आक्षेप घेतला होता. यामुळेच उज्वला थेटे यांचा अर्ज बाद झाला होता. माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील ह्या नगरपंचायत च्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
उज्वला थिटे कोर्टात जाणार की नाही?
दरम्यान, अर्ज बाद झाल्यामुळे उज्वला थिटे यांनी संशय व्यक्त केला होता. अनगर नगर परिषदेत उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी ४ ते ५ दिवस संघर्ष केला. आधीतर कागदपत्रच मिळत नव्हती. कशीबशी कागदपत्र मिळाली. मी माझ्या वकिलांकडून कागदपत्र तीन ते चारवेळा तपासून घेतली होती. सुचकाची सहीही सुद्धा होती. जेव्हा मी अर्ज भरला तेव्हा माझा मुलगा सोबत होता. त्याची सही सुद्धा होती. मग सुचकाची सही राहिलीच कशी, हे कसं होऊ शकतं. या विरोधात कोर्टात जाणार' अशी भूमिका थिटे यांनी घेतली आहे. पण, आता अर्जावर सही नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी समोर आणल्यामुळे थिटे कोर्टात आव्हान देणार की नाही हे पाहण्याचं ठरणार आहे.
