उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भाषण करताना अजितदादांच्या आठवणीने भावूक झाल्याचे दिसून आले. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवताना त्यांनी अजितदादांनी केलेले कार्य पुढे सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाषणात काय म्हटले? वाचा शब्द न शब्द....
राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला सुखी-समाधानी ठेव, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालायचं बळ आम्हा सर्वांना दे, असं साकडं मी आई शिवाई देवीच्या चरणी घालते. यापूर्वी अनेकदा शिवछत्रपती महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांना वंदन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. पण आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे. मी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली, त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. जिजाऊ माँसाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, त्यांना स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली. तीच तुमची आमची प्रेरणा आणि आधार आहे. शिवरायांच्या जन्मभूमीवर आज बोलताना माझ्या अंगावर काटा आला आहे. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली. आपण सगळेजण शिवरायांचे मावळे आहोत, हीच भावना आज माझ्या मनात आहे. ज्या विचारांवर आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द मी या पवित्र भूमीवर शिवजयंतीच्या दिवशी मी तुम्हाला देते.
advertisement
ज्या कठीण प्रसंगी मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी माझ्या नजरेसमोर जिजाऊ होत्या. अजित पवारांनी आयुष्यभर ज्या फुले शाहू आंबेडकर व विचारांनी वाटचाल केली तो विचार मी आयुष्यात कधीही सोडणार नाही हे तुम्हाला मी आश्वासन देते. याच ठिकाणी अजित दादांनी अनेकदा भाषण दिलेले आहे. दादांना या शिवनेरी किल्ल्याबद्दल जिव्हाळा तर होताच पण या शिवनेरी किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. अजित पवारांनी मागील अर्थसंकल्पात देखील आग्रा, संगमेश्वर, रायगड, वढू बुद्रुक या ठिकाणी कामे सुरू केली होती. या प्रत्येक ठिकाणी भावी पिढीला प्रेरणा मिळणार आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकाची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध असेल.
