काय आहे सुप्रिया सुळे यांचे ट्वीट?
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आदरणीय अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने काही तथ्ये आणि शंका उपस्थित करत आहेत. या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत."
advertisement
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, "यंत्रणेकडून उत्तरे मिळण्यास उशीर झाल्यास अस्वस्थता वाढेल. त्यामुळे या घटनेतील सत्य पारदर्शकपणे समोर येणे गरजेचे आहे. रोहित पवार जनतेच्या मनातील प्रश्न विचारत असल्याने त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे."
सुरक्षेची मागणी का?
रोहित पवार ज्या पद्धतीने या प्रकरणाचा तांत्रिक आणि सखोल अभ्यास करून पाठपुरावा करत आहेत, ते पाहता त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबीयांना आपल्या सुरक्षितेची काळजी वाटत असल्याचे म्हटले.
"व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा घटनादत्त अधिकार आहे," असे म्हणत सुळे यांनी राज्य सरकारला याप्रकरणी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
रोहित पवार यांचे महत्त्वाचे सवाल...
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तपासात होणाऱ्या दिरंगाईवर त्यांनी शंका व्यक्त केली असून व्हीएसआर कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर सवाल केले. 'व्हीएसआर' कंपनीच्या विमानाने हा अपघात झाला, त्या कंपनीच्या तांत्रिक त्रुटींकडे त्यांनी लक्ष वेधले. विमानात प्रमाणाबाहेर इंधन का भरले होते? हा घातपाताचा प्रयत्न होता का? विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा काय जळाला, असे विविध सवालही त्यांनी केले.
