महिलांच्या लैंगिक शोषण, जादूटोणा, आर्थिक फसवणूक, दमदाटी आणि धमकी आदी प्रकरणांत अशोक खरात याच्या नावे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पोलिसांत तक्रारी दाखल आहेत. अशोक खरात याला एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेली असली तरी दुसऱ्या प्रकरणात मात्र तो पोलीस कोठडीत आहे. गेल्या १३ दिवसांपासून विशेष पोलीस पथक त्याची कसून चौकशी करीत आहे. याच चौकशीत राजकीय नेत्यांशी खरातचे किती मजबूत संबंध होते, हे दर्शविणारे फोन कॉल्स दमानिया आणि अंधारे यांनी समोर आणले आहेत.
advertisement
चाकणकरांचे खरातला १७७ कॉल, चाकणकरांच्या बहिणीचे २३६ कॉल
रुपाली चाकणकर यांची अशोक खरात याच्याशी जवळीक होती, हे आता लपून राहिलेले नाही. यामुळेच त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, चाकणकर आणि खरात यांच्यात जवळपास १७७ फोन कॉल झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. अशोक खरात याचे 33 हजार पेक्षा जास्त सेकंद रूपाली चाकणकर यांच्यासोबत बोलणे झाले आहे. तसेच रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांच्याशी खरातचे २३६ कॉल झाल्याचा दावाही त्यांनी केला.
एकनाथ शिंदे, तटकरे, चंद्रकांत पाटलांचे खरातला किती फोन?
सर्वसामान्य जनतेपुढे ही माहिती यायला हवी, यासाठी मी सांगत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे सतरा कॉल आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण 21 मिनिटांचे आहे. अशा व्यक्तीसोबत एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल झाले आहेत (10 इनकमिंग आणि 7 आऊटगोईंग) तर ते कशा संदर्भात झाले आहेत ते त्यांनी सांगणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी आठ कॉल आहेत, असेही अंधारे यांनी सांगितले. राजकीय नेत्यांचे हे कॉल व्हॉट्सअप आहेत की व्हाईस कॉल, हे देखील समोर यायला हवे. व्हाट्सअप कॉलची माहिती मिळत नसते, विशेष पोलीस पथकाने हे चौकशीत शोधून काढावे, असेही त्या म्हणाल्या.
नवनवे खुलासे समोर मग एसआयटी तपासाचा वेग का वाढवत नाही?
खरात प्रकरणातले नवनवीन खुलासे माध्यमांकडे किंवा इतर सगळ्यांकडे येत आहेत. मग हे खुलासे नेमके एसआयटीकडे का बरं नसतील? आणि जर असतील तर एसआयटी या संबंधातला तपासाचा वेग अजूनही का वाढवत नाही, असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.
