रत्नागिरी : बेकरीतील पेढे खाल्ल्याने 11 जणांना विषबाधा झाल्याची घटना गुहागरमधील शृंगारतळी बाजारपेठेत घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बाधितांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली याची चौकशी करण्यात येत आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,गुहागर येथील एकाच कंपनीत कामाला असलेल्या महिलांनी आज श्रावणातील तिसरा सोमवार असल्याने काहीतरी गोड पदार्थ खाण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी गुहागर येथील न्यू बेंगलोर अय्यंगर बेकरीतून पेढे खरेदी केले. मात्र पेढे खाल्ल्यानंतर महिलांची तब्येत बिघडू लागली. महिलांच्या पोटात दुखू लागले, त्यानंकर महिलांना उलट्या होण्यास सुरुवात झाली. यानंतर पेढा खाल्यामुळेच सर्वांना विषबाधा झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले.
advertisement
बाधित झालेल्यांमध्ये 11 महिलांचा समावेश
अचानक महिलांची तब्येत बिघडल्याने घबराट पसरली. त्यानंतर तातडीने बाधित लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधित झालेल्यांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे. अनेकांना उलट्या आल्याने अशक्तपणा आला आहे. विषबाधा झालेल्या महिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती
बेकरी केली बंद
या घटनेनंतर बेकरी दुकानाला सील करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहे. याबरोबरच या बेकरीतील पदार्थांचे नमुने अन्न आणि औषध प्रशासन तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच नेमकी ही विषबाधा कशी झाली याची निश्चिती होणार आहे.
मिठाई खरेदी करताना काळजी घ्या
लाडू, पेढे, बर्फी अशा अनेक गोड पदार्थांची खरेदी सणासुदीला मोठ्या प्रमाणात होते. पण तुम्हाला माहिती आहे का? या सीझनमध्ये नकली मिठाईचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून अशा वेळेस खरेदी करत असताना थोडी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. दुग्धजन्य पदार्थ नोंदणीधारक व परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावेत. खवा-मावा खरेदी करतानाही वास आणि रंग यावर लक्ष ठेवा. उघड्यावरील मिठाई, खवा खरेदी करू नये. खव्यापासून तयार केलेले पदार्थ 24 तासांच्या आतच खावेत. मिठाईवर बुरशी आढळल्यास ती खाऊ नये.
मिठाई खराब असल्याची शक्यता किंवा चवीत फरक जाणवल्यास खाऊ नये.