मिळालेल्या माहितीनुसार, पवन सुरेश खंडागळे (वय 19, रा. गणेशपूर) आणि त्याचा मित्र गौरव पाचरणे (वय २०) हे दोघे रिसोडच्या दिशेने दुचाकीने जात होते. दरम्यान, गवळी यांच्या फार्महाऊससमोर आल्यानंतर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली दुचाकी महामार्गावरील दुभाजकावर जोरात आदळली. धडकेनंतर दुचाकी मार्गालगतच्या नाल्यात जाऊन पडली. अपघात इतका भीषण होता की पवन खंडागळे याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गौरव पाचरणे याला तातडीने उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
गावावर शोककळा
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार अतिवेग हेच अपघाताचे मुख्य कारण असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. धुळवडीच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गणेशपूर गावावर शोककळा पसरली आहे. आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या गावकऱ्यांवर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला. पवन खंडागळे हा कुटुंबातील कर्ता मुलगा असल्याने त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, नागरिकांनी वाहनचालकांना अतिवेग टाळण्याचे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
