विशेष मुलांच्या आयुष्यात आनंद, आत्मविश्वास आणि सामाजिक सहभागाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. यंदा या रंग महोत्सवात तब्बल 22 संस्थांचा सहभाग नोंदवला गेला. विविध विशेष शाळा, स्वयंसेवी संस्था आणि पुनर्वसन केंद्रांतील सुमारे 2500 मुलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत रंगपंचमीचा आनंद लुटला.
मैदानावर सकाळपासूनच रंगांची उधळण सुरू झाली होती. मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हास्य आणि जल्लोष हेच या उपक्रमाचे उद्देश आहे. स्वयंसेवकांनी मुलांसोबत रंग खेळत त्यांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून दिले. कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेले सर्व रंग नैसर्गिक असल्याने मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आयोजकांनी पर्यावरणपूरक रंगांचा वापर केला आहे.
advertisement
कार्यक्रमात संगीत, नृत्य आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला असून ढोल-ताशांच्या गजरात आणि रंगांच्या वर्षावात विशेष मुलांनी मनमुराद आनंद घेत पालक आणि शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. गेली तीन दशके हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून प्रत्येक वर्षी सहभागी संस्थांची आणि मुलांची संख्या वाढत आहे. समाजातील सर्व घटकांनी विशेष मुलांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य केले पाहिजे.
रंगपंचमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा ‘रंग बरसे’ महोत्सव विशेष मुलांसाठी आनंदाची पर्वणी ठरत असून रंगांच्या माध्यमातून आनंद, समानता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम पुणेकरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





