ठाण्यातील गावदेवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, "आधी मराठी भाषा दिवस फक्त तारखेपुरता होता मात्र 2007 साली मनसे पक्षाने पहिल्यांदा महाराष्ट्रात हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, आणि मग त्यानंतर दुसरे साजरे करायला लागले. दुसऱ्या राज्यांमध्ये साहित्य संमेलन होत नाहीत पण महाराष्ट्रात ती आजही होतात कारण महाराष्ट्र हा पुढारलेला आहे".
advertisement
राज ठाकरे पुढे म्हणाले, "मराठी भाषेत अनेक चित्रपट येतात मात्र त्यांच्या काही कमतरता आहेत, येत्या काळात त्या सुधारून पुढे जावे लागेल. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट येतात जे तामिळ, तेलगू इत्यादी भाषांमध्ये डब होतात परंतु मराठी भाषेत डब होणारे चित्रपट फार कमी आहेत. आपण आपल्या भाषेचा हट्ट केला पाहिजे. रवींद्र नाथ टागोर यांना मॅगसेसे पुरस्कार मिळालाय त्यांचे सर्व साहित्य हे बंगाली भाषेत आहे. पण त्यांच्या साहित्याची दखल जगाला घ्यावी लागली. मराठी भाषा ही संस्कार असलेली आहे, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही याच वाईट वाटतं. फक्त एक दिवस या भाषेचा सन्मान करतो पण इतर दिवशी काय करतो. मराठी माणसाने मराठी भाषेसाठी काय केलं पाहिजे याची शपथ दोनच दिवसात आणणार आहे. तेवढी जरी गोष्ट प्रत्येक मराठी माणसाने केली तर मराठी भाषा दिन 365 दिवस साजरा करू शकू", अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.
