वाल्मीक हयाळींगे आणि नारायण हयाळींगे असं मृत पावलेल्या दोघांची नावं आहेत. दोघंही रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. दोघांचे अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी रास्ता रोको करत दोघांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी वाल्मीक संजय हयाळींगे (वय 27) यांचा मृतदेह सरकारी दवाखान्यासमोरील तलावात सापडला होता. 11 नोव्हेंबरच्या रात्री वाल्मीक हा त्याचा विनोद नामक मित्रासोबत घरातून निघाला होता. पण तो पुन्हा घरी आला नाही. या प्रकरणी वाल्मीक हरवल्याची नोंद पोलिसात झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच 13 नोव्हेंबर रोजी तलावाशेजारील हॉटेलमध्ये काम करणारे नारायण रामदास हयाळींगे (वय 52) हेही रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले.
advertisement
दरम्यान, १४ नोव्हेंबरला वाल्मीकचा तर 16 नोव्हेंबर रोजी नारायण हयाळींगे यांचा मृतदेह त्याच तलावात सापडला. दोनही मृत्यू एकाच ठिकाणी सापडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाल्मीकच्या नातेवाईकांचा आरोप आहे की नारायण यांनी वाल्मीकला शेवटचं एका मित्रासोबत पाहिलं होतं आणि त्यामुळे त्यांचाही घातपात झाला.
या दोन्ही प्रकरणात घातपाताचा आरोप करत नातेवाईकांनी एरंडोल–भडगाव महामार्गावर दीड तास रास्ता रोको करत मारेकऱ्यांना अटक व शवविच्छेदन इन-कॅमेरा करण्याची मागणी केली. पोलिसांनी तपासाची हमी देत काही संशयितांना ताब्यात घेतले असून पिंपरखेड परिसरात दहशतीचे वातावरण कायम आहे.
