राज्यात मंगळवारी भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी तडकाफडकी दिल्लीत दाखल झाले. राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना शिंदे दिल्लीमध्ये पोहचले. दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांनी अमित शाहांची निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला हतबल करण्याच्या प्रयत्नांसह काही मुद्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
उद्धव ठाकरेंचा बोचरा वार...
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आताच तुम्ही म्हणालात दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे? जे दिवटे बाहेर पडले त्यांना मशालीचे महत्व कळणार नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले. सध्या आमदार निधीवरून काय सुरू आहे, याची कल्पना सगळ्यांना आहे. विरोधकांची नस दाबलीच आहे, आता त्यांच्यातही (महायुती) निधीवरून नस दाबली गेली असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. उद्धव यांनी म्हटले की, आता आपण पाहतोय आता एकजण दिल्लीत गेलाय, बाबा मला मारलं म्हणत गेलाय. लहानपणी चांगले शिक्षक लाभले असते तर ही वेळ आली नसती अशी बोचरी टीका उद्धव यांनी एकनाथ शिंदेंवर केली.
महापालिकेचा बाप कोण आहे, हेच कळत नाही...
विधान परिषदेचे शिक्षक आमदार ज.मो. अभ्यंकर यांच्या आमदार निधीतून शाळांना डिजीटल बोर्डचे वाटप करण्यात आले. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, तांत्रिक बाबींमुळे आता शिक्षण बदललं आहे. आम्ही पाटीवर शिकलो आहोत. पाटीवर अक्षर गिरवत मोठे झालो. शिक्षण स्वरूप हेच कालांतराने बदलत गेलं पाहिजे. शिक्षण आणि शिक्षक चांगले मिळाले नाही तर काय होत तर बघा. त्या सोनम वागचुंग यांचं म्हणणं ऐकून न घेत त्यांना जेलमध्ये टाकलं आहे. त्यांना देशद्रोही ठरवण्यात आलं आहे.
शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होत की, मुलाच्या पाठीवरचं ओझं कमी व्हावं. आपण टॅबमध्ये SD कार्ड दिंलं होतं. तेव्हा टॅबवर अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात केली होती. पण आता ती योजना सुरू आहे कि नाही माहिती नाही. गेल्या तीन वर्षात पालिकेचा बाप कोण आहे हेच कळत नसल्याचा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
