शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. साळवी यांनी लांजा-राजापूर मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधीत्व केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांना शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंकडून दुर्लक्ष होत असल्याने साळवींनी वेगळा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात होते.
advertisement
राजन साळवींनी काय म्हटले?
रत्नागिरीत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मनात पराभवाच्या वेदना आहेत. पण मी नाराज आहे, हे मला तुमच्याकडून समजत असल्याचे त्यांनी सांगितले. मी पक्ष सोडणार असल्याच्या सगळ्या अफवा आहेत. मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. राजन साळवी यांनी म्हटले की, माझ्याविरोधात झालेल्या चौकशीबाबतचा निर्णय हा न्यायालयातून येणार आहे. मात्र, माझ्यावर, कुटुंबावर एसीबीच्या कारवाईची टांगती तलवार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षांतराच्या मुद्यावर पुढे बोलताना राजन साळवी यांनी म्हटले की, पिकल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारणार. तसाच काहीसा प्रयत्न भाजप किंवा अन्य लोकांचा असू शकतो. मी सध्या माझ्या मतदार संघात कामं करत असून लोकांमध्ये आहे. मतदारसंघात काम करत असताना मी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या नेत्यांसोबत आतापर्यंत आपली कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले.
पराभवाला कोण कारणीभूत? शोध घ्या...
माझ्या पराभवाला कोण कारणीभूत आहे. याचा शोध घेतला पाहिजे. विरोधी उमेदवाराला कोणी मदत केली याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे राजन साळवी यांनी सांगितले.
