महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देण्यात आली आहे.
जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदार संघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल 19 जूनपर्यत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहेत. लवकरच या नेत्यांचे जिल्ह्यांमध्ये दौरे सुरू होणार आहेत.
नेत्यांच्या दौऱ्यात कोणती रणनीती?
ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश दिले आहेत.
राज्यात शिवसेना ठाकरे संघटन मजबूत आहे का? याची माहिती तसेच 2012 आणि 2017 च्या महापालिकेच्या मतदार संघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यात येणार आहे. शहरांमध्ये शहरप्रमुख, उपशहर प्रमुख, प्रभागप्रमुख, 2 वार्डसाठी उपविभागप्रमुख आणि प्रत्येक वॉर्डसाठी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि 10 जणांची टीम तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात तालुकाप्रमुख, उपतालुखाप्रमुख, गावपातळीवर शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि 10 जणांची टीम तयार करण्यात येणार आहे.
या संघटनात्मक रचना पूर्ण करून यादीचा अहवाल आणि आपल्या स्थानिक भागातील कोणते वार्ड अथवा मतदार संघ लढवणे आवश्यक आहे याची माहिती 19 जूनपर्यत शिवसेना भवन येथे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील महानगर पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यावर दिलेली जबाबदारी
>> कोणत्या नेत्यावर कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी?
> ठाणे, नवी मुंबई, मीरा भायंदर - सुभाष देसाई, राजन विचारे
> पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव शहर- संजय राऊत
> धुळे, अहिल्यानगर - अनिल परब, संजय राऊत
> कल्याण-डोंबिवली - अनिल परब
> उल्हासनगर, पनवेल शहर - अनंत गीते
> अमरावती, अकोला - अरविंद सावंत
> नागपूर, चंद्रपूर - भास्कर जाधव
> वसई-विरार शहर, भिवंडी निजामपूर शहर - विनायक राऊत
> छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, अंबादास दानवे
> लातूर, सोलापूर - चंद्रकांत खैरे
> परभणी, जालना, नांदेड-वाघाळा शहर - अंबादास दानवे
> कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज आणि कुपवाड - सुनील प्रभू