अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून 'उन्नत फेकाफेकी' केली, असे टोमणा मारला.
शेतकऱ्यांनो हे लबाडाघरचं आवतान
उद्धव ठाकरे म्हणाले, फडणवीस सरकारची २०१७ सालची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना अजूनही सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो हे लबाडाघरचं आवतान आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना कधीपर्यंत पूर्ण करणार? हे फडणवीस यांनी का सांगितले नाही? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले. तसेच सरकारने योजना जाहीर करताना शब्दच्छल केल्याचेही ठाकरे म्हणाले.
advertisement
तुम्ही सातबारा कोरा करणार होतात त्याचे काय झाले?
सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन का पूर्ण केले नाही? ही पण योजना २०४७ पर्यंत घेऊन जाणार का? आम्ही कालबद्ध पद्धतीने योजना राबवली. तुम्ही सातबारा कोरा करणार होतात त्याचे काय झाले? असे उद्धव ठाकरे यांनी विचारले.
दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची नाराजी
आज राज्य सरकारकडून दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. त्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नाराजी व्यक्त करत कमीत कमी पाच लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे होती. त्यात सोयाबीनला योग्य भाव देण्यासंदर्भात घोषणा व्हायला पाहिजे होती. मात्र तसे झाले नाही, अशी नाराजी रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली.
