विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच तीन-चार महिन्यांनी महापालिका निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे या निवडणुका लक्षात घेता आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आजी-माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाकरेंनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगरसेवकांना मार्गदर्शन आणि काही सूचना दिल्या आहेत.
खरं तर मुंबई महापालिका हा ठाकरेंचा गड आहे. या गडावर पुन्हा एकदा भगवा फडकावण्यासाठी ठाकरेंनी मोठी रणनिती आखली आहे. या रणनितीनुसार ठाकरेंनी हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे, उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार असल्याचे म्हटले आहे. त्या लोकांमध्ये जाऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडा अशा सुचना ठाकरेंनी नगरसेवकांना दिला आहे. खंर तर आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य तो प्रतिवाद करा, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिल्या आहेत.
advertisement
तसेच भाजप पक्षासाठी बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात. तसं आपणही तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे, असं मत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांसमोर मांडलं आहे. त्यामुळे आपल्याला मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका, पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने कामाला लागा, असा कानमंत्रही ठाकरेंनी माजी नगरसेवकांना दिला आहे. त्याचसोबत ईव्हीएमचा मुद्दा आम्ही बघू पण तुम्ही संघटनात्मक बांधणी करायला सुरुवात करा, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा,अशा सूचना उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना केल्या आहेत.
