मत दिलं तर योजनांना निधी देईल, मतदान केले नाही तर निधी कात्री लावेन, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असतील पण तिजोरीचा मालक आपला आहे, असा पलटवार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यावर कुरघोडी म्हणून अर्थमंत्री आपलेच आणि चाव्याही आपल्याच हातात, असे विधान रुपाली चाकणकर यांनी केले. नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी याच नेत्यांच्या बेताल विधानाचा समाचार घेतला.
advertisement
महाराष्ट्राच्या तिजोरीतील पैसा तुमच्या बापजाद्यांनी कमावलाय का?
मते दिली नाही तर निधी देणार नाही, महाराष्ट्राची तिजोरी ही सत्ताधाऱ्यांची खासगी संपत्ती आहे का? यांच्या बापजाद्यांनी कमावलेली तिजोरी आहे का? सत्ताधारी जनतेला धमकावत आहे, गुंडगिरीचा भाषा वापरत असताना निवडणुका आयोगाला दिसत नाही का? अशा वक्तव्याची दखल निवडणूक आयोग घेऊन कारवाई का करत नाही असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
निवडणुकीत निधीची भाषा करणे म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे
ऐन निवडणुकीत निधीची भाषा करणे म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे. सत्ताधारी मतदारांना गृहित धरत आहे निवडणूक आयोगाने याबाबत कारवाई केली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत पण कुंभमेळ्यासाठी खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत
एकीकडे राज्यातील शेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसला आहे दुसरीकडे सरकारने कुंभमेळ्यासाठी २५ हजार कोटी मंजूर केले आहे. शेतकऱ्यांसाठी पैसे देण्याची वेळ आली की पैसे नसतात पण कुंभमेळ्यासाठी इतका खर्च केला जातो? यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते! कुंभमेळ्यासाठी झाड तोडली जाणार आहे,कुंभमेळा महत्वाचा की बळीराजा? शेतकऱ्यांनी या सत्ताधाऱ्यांना जागा दाखवली पाहिजे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
