संगमनेर : अहमदनगरमधला थोरात आणि विखे यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे. सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. वसंतराव देशमुख यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी सुजय विखे पाटलांच्या भाषणानंतर सभास्थळी ठिय्या आंदोलन केलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वसंतराव देशमुखांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
advertisement
दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावातही या वक्तव्याचे पडसाद उमटले. अकोलेनाका परिसरामध्ये एका गाडीची जाळपोळ करण्यात आली आहे. काही अज्ञातांनी या गाडीची जाळपोळ केली आहे. यानंतर संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने ही आग विझवली आहे.
विखे-थोरातांच्या पुढच्या पिढीचा संघर्ष
मागच्या दोन पिढ्यांपासून सुरू असलेल्या विखे-थोरातांचा संघर्षाचा पुढचा अंक विधानसभा निवडणुकीत सुरू झाला आहे. मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडणाऱ्यांना आता आमदारही होता येणार नाही, असा टोला सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना हाणला होता. यावर बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं. माझ्या बापाला त्रास दिला तर खबरदार, थोरातांमुळेच तालुक्याचा विकास झाला आहे. हा बाप माझ्या एकटीचा नाही तर तालुक्यातल्या 7 लाख जनतेचा बाप आहे, असा पलटवार जयश्री थोरात यांनी केला.
जयश्री थोरात यांनी केलेल्या या टीकेवर पुन्हा एकदा सुजय विखेंनी प्रत्युत्तर दिलं. आम्ही जनतेला मायबाप मानतो, तेच या निवडणुकीत दाखवून देतील, असं सुजय विखे म्हणाले. त्याचसोबत सुजय विखेंनी जयश्री थोरात यांचा उल्लेख संगमनेरची राजकन्या असा केला.
