पती सोमनाथ भोयर (38), पत्नी निकीता सोमनाथ भोयर (32) आणि मुलगा पुरब सोमनाथ भोयर (6) असं मृत पावलेल्या तिघांची नावं आहेत. तर तिघेही गणेशनगर इथं एका कार्यक्रमासाठी गेले होते. भोयर कुटुंब गणेशनगर येथून कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून आपल्या घरी परतत असताना भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भयंकर होती की तिन्ही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला. धडक झाल्यानंतर वाहन चालकाने जागेवरून पळ काढल्याची प्राथमिक माहिती आहे. चारचाकी वाहन वायगाव इथले आहे. घटनास्थळी तातडीने नागरिकांनी धाव घेत जखमी मुलाला त्वरित सावंगी येथील रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून अचानक झालेल्या या अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फरार वाहनचालकाच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. ग्रामीण भागात वाढत्या वाहतूक आणि बेदरकार वाहनचालकांमुळे असे अपघात वाढत असल्याची नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसर शोकाकुल झाला असून मित्र परिवाराकडून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
