नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अर्धापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर भागात शुक्रवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास घडली. मयत व्यंकटी हा रात्री आपल्या घरी शांतपणे जेवण करत होता. त्याच वेळी बाहेर रस्त्यावर वाद सुरू झाला. 'आमच्या घरावर का दगड फेकले?' या कारणावरून हा वाद सुरू होता. बघता बघता या वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं.
advertisement
भांडणाचा आवाज ऐकून व्यंकटी जेवणाच्या ताटावरून तसाच उठून बाहेर आला. तो मध्यस्थी करून वाद मिटवण्याच्या उद्देशाने तिथे गेला होता, मात्र संशयित आरोपींनी संगनमत करून त्यालाच लक्ष्य केले. संशयित आरोपींनी व्यंकटीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याला रस्त्यावरील सिमेंटच्या दुभाजकावर जोरात आपटले, ज्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी व्यंकटीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मधू तांदुळकर, गणेश तांदुळकर, मारुती तांदुळकर आणि लता तांदुळकर यांच्या नावाचा समावेश आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. व्यंकटीच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या नातेवाइकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला. संतप्त झालेल्या नातेवाइकांनी आरोपींच्या घरावर हल्ला करत घर जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरातील काही दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
