नाशिकच्या विकृत भोंदूच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. बड्या बड्या नेत्यांचा गुरु असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या अनेक कारनाम्यांचा भांडाफोड होतोय. लोकांची कुंडली सांगणाऱ्या कॅप्टन खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अख्खी कुंडलीच पोलिसांच्या हाती लागली आहे. अशोक खरात प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात खरातची गुरूवारी दोन तास कसून चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या पॅनड्राईव्हबाबतही त्यांनी विचारपूस केल्याचे कळते. खरात याच्याभोवती राजकीय नेत्यांचा गराडा असायचाच, त्याचबरोबर प्रशासनातील अधिकारी बदली, प्रमोशन अशा कामांसाठी त्याचे मार्गदर्शन घेण्यासाठी यायचे. खरातला मुंबईतला एक उपजिल्हाधिकारी विशेष मदत करीत असे.
advertisement
मुंबईतला तो डेप्युटी कलेक्टर कोण?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नेत्यांबरोबरच प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याची पोलखोल केली आहे. मुंबईतील एक डेप्युटी कलेक्टर (उपजिल्हाधिकारी) खरातला सतत मदत करत आहेत. ते खरातला पैसे आणि वकील पुरवत असून त्यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
मुंबईतील त्या उपजिल्हाधिकाऱ्यांचे खरात याच्याशी आर्थिक हितसंबंध होते. खरात याला पैसा आणि वकील पुरविण्याचे काम संबंधित उपजिल्हाधिकारी करत आहे, असे अधिकाऱ्याचे नाव न घेता अंजली दमानिया यांनी सांगितले.
महिलांवर अत्याचार कसा करायचा? कॅप्टनची विशेष मोडस ऑपरेंडी
मी कृष्णाचा अवतार आहे. तू मागच्या जन्मातील माझी राधा आहे, असे सांगून महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन कॅप्टन खरात त्यांच्या कानाजवळ पुटपुटायचा. त्यापूर्वी पेढा आणि कडवट -खारट चव असलेले पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्री म्हणायला लावायचा आणि लागलीच त्यांना अंगाला स्पर्श करायला सुरुवात करायचा. महत्त्वाचे म्हणजे महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली त्याच्या दालनाबाहेर बसवून ठेवायचा.
महिलांना गुंगी आली की त्यांचे लैंगिक शोषण करीत असे. कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा हा पॅटर्न होता. कधीकधी संमतीने तर कधी जबरदस्तीने तो महिलांवर अत्याचार करीत असे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्याची काळी कृत्ये सुरू असल्याची माहिती आहे.
प्रसाद म्हणून भुकटी केलेली वायग्रा खायला द्यायचा
अशोक खरात आपल्या मंदिरात येणाऱ्या महिलांना प्रसाद म्हणून विशेष जल द्यायचा. ज्याला तो 'ओश्नो जल' म्हणायचा. हे जल म्हणजे प्रत्यक्षात कफ सिरप, पाणी आणि भुकटी केलेली वायग्रा (Viagra) गोळ्यांचे मिश्रण असायचे. हे ओश्नो जल मिळवण्यासाठी अनेक वेळा रांगा लागायच्या.
