मुक्ताईनगर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. यानंतर खडसेंचा भाजप प्रवेश अजूनही रखडलेला आहे. आता खुद्द एकनाथ खडसेंनीच त्यांच्या रखडलेल्या भाजप प्रवेशाचं कारण सांगितलं आहे.
'माझा पक्षप्रवेश हा निश्चित आहे, असं विनोद तावडेंनी वारंवार सांगितलं आहे. निवडणुका होईपर्यंत मी थांबलो आहे, यासाठी कारण काहींनी माझ्या पक्षप्रवेशाविषयी नाराजी व्यक्त केली होती. निवडणुका संपल्यानंतर ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून केला जाईल. त्यानंतर माझ्या पक्षप्रवेशाचा मार्ग आणखी सुकर होईल', असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
advertisement
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एनडीएमध्ये यायची ऑफर दिली. या ऑफरवरही खडसेंनी भाष्य केलं आहे. 'मोदीजींनी जे वक्तव्य केलं आहे, त्याचा अर्थ मला अजून समजलेला नाही. कदाचित भविष्य कालखंडातली ती नांदी असावी. कारण त्यांनी ते जबाबदारीने केलेलं ते वक्तव्य आहे. पुढची राजनिती ठरवण्याचा उद्देश त्यांच्या या वक्तव्यामागे असावा', अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे.
सुरूवातीला एकनाथ खडसे रावेरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाकडून रिंगणात उतरतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण प्रकृतीच्या कारणामुळे आपण निवडणूक लढणार नसल्याचं खडसेंनी सांगितलं. भाजपने या मतदारसंघातून एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली, त्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. 2020 साली एकनाथ खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, त्यानंतर खडसे विधान परिषदेचे आमदारही झाले होते. एकनाथ खडसेंनी शरद पवारांची साथ सोडली असली तरी खडसेंची कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचं सांगितलं आहे.