प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांच्या आरोपावर पहिल्यांदाच आक्रमक उत्तर दिली आहे.
"आमच्या सर्वांचे नेते अजितदादांच्या निधनानंतर पक्ष ताब्यात घेण्याची अघोरी इच्छाशक्ती असल्याचा आरोप केला जात आहे. पण, सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे सूत्र हाती घेतल्यामुळे काही डोमकावळे हे आमच्या पक्षामध्ये डोकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या पक्षात काय चाललंय हे त्यांनी पाहावं. अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये साामील होण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी अजितदादांनी पक्ष पळवला, चिन्ह चोरलं असा आरोप केला. आता आमच्या पक्षात काही महाभाग हे डोकवण्याचा प्रयत्न करत आहे' असा सणसणीत टोला सुनील तटकरेंनी रोहित पवारांना लगावला.
advertisement
"अजितदादांचं निधन झालं त्यावेळीच विलीनीकरणाची चर्चा सुरू केली. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांना अलिप्त ठेवत पक्ष ताब्यात घेण्याची धडपड सुरू झाली होती. त्याच्यामुळे सततची वक्तव्य समोर आली ती सगळ्यांनी पाहिजे, सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर विधानं सगळ्यांनी पाहिली आहे. प्रचंड द्वेषाची कावीळ दादांच्या कुटुंबीयांबद्दल झालेल्या लोकांना आता आम्हालाच कशी काळजी पडली आहे, असं दाखवत आहे. आपण पाहिलं तर देशाचे नेते पवार साहेबांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्नेहभोजनासाठी बोलावलं होतं. त्याच स्नेहभोजनाला न जाणारे हे महाभाग का गेले नाही. १० आमदार असणारा पक्ष फक्त ३ आमदार तिथे हजर होते. त्याचे उत्तर दिले पाहिजे' असा टोलाही तटकरेंनी रोहित पवारांना लगावला.
कटकारस्थानं कार्यकर्ते हाणून पाडतील
"अशा प्रकारची मांडणी सुरू आहे. सुनेत्रा पवार, पार्थ, जय पवार यांच्याबद्दल कमालीचा द्वेष निर्माण होत आहे. वहिनींच्या नेतृत्वाखाली मी, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि ४० आमदार आहे. आणि संघटन ज्या पद्धतीने काम करत आहे, त्याच्यामुळे स्वत: च्या राजकीय अस्तित्वाची भीती जाणवत असल्यामुळे तशी वक्तव्य करत आहे. प्रत्येक दिवस हा प्रसिद्धीसाठी आहे म्हणून काहीही बोलायचं. एकतर आपल्या पक्षात काय चाललं हे पाहावं. जयंत पाटील सारख्या नेत्याने ४० वर्ष काम केलं. त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी शिर्डीच्या महाअधिवेशनामध्ये शरद पवार उपस्थितीत असताना केली होती, असे हे महाभाग आहे. त्यांनी आता आमच्या पक्षाबद्दल बोलणं थांबवलं पाहिजे. खूप काही बोलण्यासारखं आहे. १९९९ सालापासून ते अजितदादांच्याविरोधात मृत्यूपर्यंत जी काही कटकारस्थानं झाली आज तीच कटकारस्थानं वहिणी, पार्थ आणि जय पवार यांच्याविरोधात केली जात आहे. ही कटकारस्थानं मी आणि आमचे कार्यकर्ते हाणून पाडतील, असंही तटकरेंनी ठणकावून सांगितलं.
मला २०१४ पासून टार्गेट केलं जात आहे. मी अजितदादांच्यासोबत कायम राहिलो. त्यामुळे आम्हाला टार्गेट केलं जात आहे. अजितदादांनी पक्ष मोठा केला. आम्ही प्रत्येक निर्णयामध्ये अजितदादांच्या सोबत होतो. अजितदादांचं निधन झाल्यानंतर हॉस्पिटलला आणण्यात आलं होतं. तिथून पार्थिव शवविच्छेदनाला आणलं होतं, तिथे काय काय घडलं याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे कृपया करून आता थांबा, वहिणी, पार्थ आणि जय पवार यांच्याविरोधात काय कटकारस्थानं केली, त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे थांबा जरा, असा इशाराच सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांना दिला.
