पंढरीत आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ वारीला भाविकांची मांदियाळी असते. या वारीपैकी आषाढी वारी सर्वात मोठी मानली जाते. महाराष्ट्रासह कर्नाटक तसेच इतर राज्यांतून देखील विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी पंढरपुरात येतात. पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत जात असताना पांडुरंगाचा प्रसाद म्हणून चुरमुरे घेऊन जात असतात. आषाढी वारी जवळ येत असते तसतसे व्यापारी चुरमुरे मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवतात. आषाढी वारीत मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची वर्षभराची उलाढाल या एका वारीतून होते.
advertisement
Ashadhi Wari 2025: पंढरीची वारीच का? कोल्हापूरच्या वारकऱ्याचे बोल लय भारी, तुम्हीही म्हणाल जय हरी!
आषाढी वारीत 10 रुपयांपासून मिळणाऱ्या चुरमुरे प्रसादाची 1 कोटीची उलाढाल होते. तसेच कुंकू, बुक्का, अष्टगंध, पेढा, मूर्ती, फोटो व अगरबत्ती, साबुदाणा, केळी, अन्य फळांमधून 2 कोटी रुपयांची उलाढाल होते. तसेच हॉटेल, लहान मुलांच्या खेळणी, संसारोपयोगी साहित्य, टाळ, मृदुंग, वीणा यामधून 30 ते 40 कोटींची उलाढाल या आषाढी वारी कालावधीत होत असते. स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच बाहेर राज्यांतून येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या ही अधिक असते.
काही दिवसांवर आषाढी वारी येऊन ठेपली असून व्यापाऱ्यांनी देखील जय्यत तयारी केली असून व्यापारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वारी कालावधीमध्ये फक्त चुरमुऱ्याच्या प्रसाद विक्रीतूनच एक कोटीची उलाढाल होत असल्याची माहिती व्यापारी रमेश लोखंडे यांनी दिली आहे.