या छाप्याची योजना अशी होती की ती एका दिवसात पूर्ण व्हावी, पण तिला पूर्ण होण्यासाठी दोन दिवस आणि तीन रात्री लागल्या. इतका मोठा पैसा सापडला की त्याला मोजायला तब्बल 18 तास लागले. हे पैसे मोजण्यासाठी 45 लोकांची टीम लावण्यात आली होती, ज्यात रिझर्व्ह बँकेचे कर्मचारीही होते.
सरदार इंदर सिंह
advertisement
हा छापा सरदार इंदर सिंह यांच्या ठिकाणांवर झाली होती. तर प्रथम हे जाणून घेऊया की इंदर सिंह कोण होते. सरदार इंदर सिंह हे कानपूरचे एक प्रतिष्ठित उद्योजक आणि माजी राज्यसभा खासदार होते. 1928 मध्ये त्यांनी कानपूरमध्ये सिंह इंजिनिअरिंग वर्क्सची स्थापना केली होती. जे भारतातील पहिले स्टील री-रोलिंग मिल होते. याशिवाय त्यांनी उत्तर भारतातील सर्वात मोठी रेल्वे वॅगन फॅक्टरी (सिंह वॅगन फॅक्टरी) स्थापन केली आणि भारतीय रेल्वेसाठी टाय बारचे सर्वात मोठे पुरवठादार बनले. राजकारणाच्या दृष्टीने इंदर सिंह 1946 ते 1951 दरम्यान पंजाब विधानसभेचे सदस्य (आमदार) होते. नंतर त्यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवण्यात आले.
16 जुलै 1981 रोजी सकाळी 8 वाजता इनकम टॅक्स विभागाचे 90 हून अधिक अधिकारी आणि 200 पोलिसांचा एक दल सरदार इंदर सिंह यांच्या कानपूरमधील स्वरूप नगर येथील निवासस्थानी पोहोचले. या ऑपरेशनचं नेतृत्व तत्कालीन उपसंचालक (गुप्तचर विभाग) अलक कुमार बटब्याल आणि कानपूरचे आयकर आयुक्त शारदा प्रसाद पांडे यांनी केलं.
ही रेड केवळ इंदर सिंह यांच्या घरीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या घरीही झाली. यात कानपूरमधील तिलक नगर, लाजपत नगर आणि आर्य नगर याठिकाणी असलेल्या त्यांच्या पत्नी, मुलं आणि जावयांच्या घरी देखील छापे टाकण्यात आले.
या रेडमध्ये काय सापडलं?
या छापेमारीत मिळालेल्या गोष्टींची चर्चा संपूर्ण देशात झाली. सांगितलं जातं की पहिल्याच दिवशी कानपूरमध्ये 92 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. 1981 मध्ये 92 लाखांची किंमत आजच्या कोट्यवधी रुपयांमध्ये असू शकते.
याशिवाय दिल्लीतील लॉकरमधून 72,000 रुपये रोख, 1.10 लाख रुपयांच्या एफडीच्या पावत्या सापडल्या. हे केवळ पहिल्या दिवशीचं विवरण होतं. ही रेड 2 दिवस आणि 3 रात्री चालली. संपूर्ण कारवाईदरम्यान एकूण 1.6 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
याशिवाय 250 तोळे सोनं मिळालं. यात दोन सोन्याच्या विटांचा समावेश होता. जवळपास 8 लाख रुपये किमतीचे दागिने मिळाले आणि 144 गिन्या (जवळपास 1.85 लाख रुपये) जप्त करण्यात आल्या.
या कारवाईत कानपूर, दिल्ली आणि मसुरीमधील विविध नावे असलेल्या 15 बँक लॉकर उघडण्यात आले. कानपूरमधील दोन लॉकरमधून 6 सोन्याच्या विटा सापडल्या, ज्यांची एकूण किंमत सुमारे 30 लाख रुपये होती. प्रत्येक विटेचं वजन 250 तोळे होतं.
दरम्यान अनेक महत्त्वाचे दस्तऐवजही सापडले. जे सरदार इंदर सिंह आणि त्यांच्या कुटुंबाच्या 16 महागड्या मालमत्तांशी संबंधित होते. यात कानपूरमधील 4, कन्नौजमधील 7, मुंबईतील 2 आणि दिल्लीतील 1 मालमत्तेचा समावेश होता.
सरदार इंदर सिंह यांच्या पत्नी मोहिंदर कौर यांच्या निवासस्थानी 500 तोळे सोन्याच्या दोन विटा आणि 144 सोन्याची नाणी सापडली. ज्यांचं एकूण वजन 6,977 ग्रॅम होतं. हे सर्व 1968 च्या गोल्ड (कंट्रोल) कायद्याचा भंग करणारे होतं.
रेड का झाली होती?
सांगितलं जातं की सरदार इंदर सिंह यांच्या कुटुंबात अंतर्गत वाद होता. या वादामुळेच आयकर विभागाला कुणीतरी गोपनीय माहिती दिली होती. त्यावरूनच हे छापे टाकण्यात आले.
सरदार इंदर सिंह यांच्या पत्नी मोहिंदर कौर या माजी केंद्रीय मंत्री जगजीवन राम यांचे पुत्र सुरेश राम यांची मेव्हणी होती. काहींनी असा दावा केला की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जगजीवन राम यांच्यात काही कारणास्तव तणाव होता. त्यातूनच इंदिरा गांधींनी या रेडला परवानगी दिली.
आयकर विभागाला दीर्घकाळापासून संशय होता की सरदार इंदर सिंह आणि त्यांचा परिवार आपली उत्पन्न आणि मालमत्ता लपवत आहे. त्यांच्या मोठ्या औद्योगिक घडामोडी आणि प्रभाव असूनही त्यांनी जाहीर केलेलं उत्पन्न संशयास्पद होतं. याबाबतची माहिती वित्त मंत्रालयाद्वारे इंदिरा गांधींना पोहोचली होती.
रेडनंतर काय घडलं?
छापेमारीनंतर आयकर विभागाने सरदार इंदर सिंह, त्यांची पत्नी मोहिंदर कौर, चार मुले, दोन जावई आणि इतर कुटुंबीयांवर नोटीस बजावल्या. सरदार इंदर सिंह यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. मात्र त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कायदेशीर लढाई सुरूच ठेवली. मोहिंदर कौर यांच्याविरोधात गोल्ड (कंट्रोल) अॅक्ट, 1968 च्या उल्लंघनाबाबत केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाही सुरू केली.
13 ऑक्टोबर 1981 रोजी आयकर अधिकारी, सेंट्रल सर्कल III, कानपूर यांनी आयकर अधिनियमाच्या कलम 132(5) अंतर्गत एक तात्पुरता मूल्यांकन आदेश जारी केला. ज्यात सरदार इंदर सिंह यांच्या कुटुंबाला 15 लाख रुपयांहून अधिक कर भरण्याचे आदेश दिले.
चित्रपट ‘रेड’मध्ये सरदार इंदर सिंह यांच्या पात्राचं नाव रमेश्वर सिंह (सौरभ शुक्ला) असं होतं. अजय देवगन यांनी आयकर अधिकारी अमय पटनायकची भूमिका साकारली होती जी अलक कुमार बटब्याल यांच्या प्रेरणेवर आधारित होती.