रंजना गोसावी या मूळच्या राहणाऱ्या नाशिकच्या पण लग्ननंतर त्या खानदेशात गेल्या. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना अचानक एक दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. 2016 साली रंजना यांच्या पतीचे कर्करोगामुळे निधन झाले. मुलांना जबाबदारी समजत नाही तोपर्यंत वडिलांचे छत्र डोक्यावरून निघून गेले. त्याच दुःखातून गोसावी परिवार बाहेर निघत नाही तितक्यात पतीच्या परिवाराकडून देखील मुलगा आज नाही तर तू इथे काय करणार? असे प्रश्न विचारणे सुरू झाले.
advertisement
त्यानंतर रंजना तीन मुलांना घेऊन माहेरी नाशिकला आल्या. मुलांचे शिक्षण त्यांना करायचे होते. माहेरी आल्या तरी जबाबदारीचे ओझे खांद्यावर होते. याकरता त्यांनी शिवणकाम येत असल्याने आजूबाजूच्या मंडळींचे ब्लाऊज शिवण्याचे काम सुरू केले. इतरांच्या घरी जाऊन कामे करण्यास सुरुवात केली.
वयात आलेल्या मोठ्या मुलाने आईचे काम हलके होण्यासाठी आईला कामात मदत करण्यास सुरुवात केली. आई देखील इतरांकडे जेवण बनवण्यास जात असे. या काळात रंजना यांनी आपली जिद्द सोडली नाही. त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलांचा पुरेपूर सांभाळ केला. एकट्या असूनही कधीही निराशा बाळगली नाही. उलट संकटांना कसे समोर जायचे हे मुलांना शिकवत राहिल्या.
पतीच्या निधनानंतर पहिल्याच अक्षय तृतीयेला त्यांचे पित्र जेऊ घालण्याचे होते. त्या वेळी रंजना या खूप आजारी होत्या. कुठलेही काम करणे त्यांना जमत नव्हते. पूजेसाठी पुरणपोळीचा नैवद्य देखील लागणार होता. काय करावे? त्या वेळी मुलाने बाहेरून आणतो असे सांगितले. परंतु कुठेही पुरणपोळी उपलब्ध न झाल्याने आजारपणाला बाजूला सारून रंजना यांनीच सर्वांसाठी पुरणपोळ्या बनवल्या आणि त्या आजूबाजूच्यांनाही दिल्या. त्यांना त्या इतक्या आवडल्या की कुठल्याही सणाला ओळखीचे लोक पुरणपोळीची मागणी करू लागले.
मुलानेही आईला सांगितले, बाहेर कामाला जाण्यापेक्षा तुझा स्वतःचा हा व्यवसाय तू सुरू कर. तुझ्या खापरावरच्या पुरणपोळ्या अनेक लोक खातील. यामुळे रंजना यांनी 10 वर्षांपासून सुरू केलेला हा पुरणपोळीचा व्यवसाय आज खूप मोठा झाला आहे. सासरवरून शिकून आलेल्या खापरावरच्या पुरणपोळ्यांची आपली ओळख होणार असे त्यांना वाटले नव्हते. पण आज त्या नाशिकच नाही तर आपल्या या पुरणाच्या पोळीची चव मुंबईत देखील घेऊन गेल्या आहेत. आज या व्यवसायातून रंजना महिन्याला 60 ते 70 हजार कमवत असतात.
ही साखरेची पुरणपोळी 70 रुपयाला आणि गूळाची 80 रुपयाला मिळते. ही खाण्याची असल्यास नाशिकमधील पंचवटीत, तपोवन साईबाबा मंदिरजवळ तुम्हाला त्यांच्या घरी ही ऑर्डरप्रमाणे मिळणार आहे. नक्कीच ही पुरणपोळी चाखून बघा.