मुंबईत गेल्या महिनाभरात सोन्याच्या तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. यात अनेक परदेशी नागरिकांना अटक झाली आहे. रविवारी (25 फेब्रुवारी) कस्टम विभागानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेगवेगळ्या तपास मोहिमांमध्ये केनियाच्या दोन महिलांना अटक केली आहे. नजमा मोहंमद आणि खदीजा तुळु नावाच्या या महिलांकडून अडीच-अडीच किलो सोनं हस्तगत करण्यात आलं आहे. दोघींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघींनी जामिनाचा अर्ज कोर्टात दिला असल्याचं ॲड. प्रभाकर त्रिपाठी यांनी सांगितलं.
advertisement
या दोन महिलांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांनी कर्ज घेऊन परदेशात हे सोनं घेतलं होतं. त्यानंतर त्या मुंबईच्या विमानात बसल्या. मुंबईत सोनं विकल्यानंतर मोठा नफा होतो, असं या दोघींना वाटत होतं. एक किलो सोन्यावर जवळपास 15 लाखांचा नफा होतो. मुंबईत जर त्यांना हे सोनं विकता आलं असतं, तर केनियामध्ये जाऊन त्यांना त्यांचं कर्ज फेडता आलं असतं आणि उर्वरित पैशांत काही वर्षं चांगलं जीवन जगायचं होतं.
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, केनियामधून सोन्याचा कच्चा माल अधिकृतपणे दुबईमध्ये नेला जातो. तिथे या सोन्याला बिस्किटांचं रूप दिलं जातं. दुबईहून सोन्याची बिस्किटं पुन्हा केनियाला पाठवली जातात आणि सामान्य माणसं ती बिस्किटं कर्ज घेऊन खरेदी करतात. मग जास्त पैशांच्या हव्यासापोटी भारतासह ज्या देशांमध्ये मोठा नफा मिळू शकतो, तिथे हे सोनं विकलं जातं.
मुंबईमध्ये गेल्या चार वर्षांत 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त सोनं हस्तगत करण्यात आलं आहे. त्यावरूनच लक्षात येऊ शकतं की, परदेशातून मुंबईत किती मोठ्या प्रमाणावर सोनं तस्करी होऊ शकते. खूपदा परदेशातले तस्कर त्यांच्या सामानात सोनं लपवून आणतात. बऱ्याचदा विमानतळाच्या आत स्वच्छतागृह किंवा मोबाइल सेंटरवर ठेवून एखाद्या विमानतळ कर्मचाऱ्याच्या मदतीनं ते विमानतळाच्या बाहेर आणलं जाते. मागच्या 15 दिवसांत मुंबईत अशा दोन घटना झाल्या आहेत. साठ आणि सत्तरच्या दशकात जेव्हा अंडरवर्ल्डचा उदय झाला नव्हता, तेव्हा त्यांच्या कमाईचं मुख्य साधनसुद्धा सोन्याची तस्करी हेच होतं. अंडरवर्ल्ड समुद्रमार्गे सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर करत होतं.
