गेल्या तीन वर्षांपासून या ब्रिजचं काम अजूनही कागदावरच आहे. 2022 पासून या पुलासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. परंतु त्या निविदेसाठी कोणीही प्रतिसाद दिलेला नाही. आता अशातच पुन्हा एकदा पूल विभागाने टेंडर मागितले आहे. ब्रिज बनवण्यासाठी 220 कोटी 17 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनचालकांना वाहन चालवताना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. यामध्ये कायमच वांद्रे पूर्व मिठी खाडीपासून माहिमच्या सेनापती बापट मार्गापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. ज्याचा परिणाम दादरपर्यंत आणि खार, सांताक्रूझपर्यंत होतो. या वाहतूक कोंडीचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी सेनापती बापट मार्गावरील मच्छिमार कॉलनी ते वांद्रे पूर्वपर्यंत उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे.
advertisement
वांद्रे पूर्व भागातील कलानगर उड्डाण पुलाच्या जवळून हा नवीन उड्डाण पूल सुरू होईल, जो मिठी खाडीवरून सेनापती बापट मार्गाला जोडेल. यामुळे उपनगर ते दक्षिण मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. 2022 मध्ये त्या उड्डाणपुलासाठी निविदाही काढण्यात आली होती. जी तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रिया मागे घेण्यात आली होती. त्यानंतर जुलै 2023 मध्ये निविदा काढण्यात आली. पण, त्या निविदेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय, निविदेची अंतिम मुदत संपल्यामुळे आता महानगरपालिकेच्या पूल विभागाने नवीन निविदा जाहीर केली आहे. त्यासाठी 220 कोटी 17 लाख 40 हजार रुपयापर्यंत खर्च येणार आहे. हा पूल मिठी नदीच्या खाडीवरून जाणार असल्यामुळे कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) आणि वन विभागाकडूनही परवानगी घ्यावी लागेल. ही परवानगी घेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असेल.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा पूल फायदेशीर ठरेल. हा पूल तब्बल दीड ते अडीच किलोमीटर लांबीचा असेल. सध्या या पट्ट्यात चुनाभट्टी ते बीकेसी आणि जुना कलानगर उड्डाणपुल आहे. याशिवाय, माहिमजवळ वांद्रे पूर्वेसाठी एक उड्डाणपुल देखील बांधला जाईल. यामुळे भविष्यात या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
