राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. अपघाताच्या आदल्या दिवशी मुंबईतील बैठका आणि भेटीगाठींमुळे अजित पवारांना बारामतीला जाण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळेचं त्यांनी खासगी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला होता. पूर्व विदर्भातील एक नेता फाईलवर सही करण्यासाठी अडून बसला होता. ती फाईल आणेपर्यंत बराच वेळ गेला. उशीर झाल्याने अजित पवार दुसऱ्या दिवशी विमानाने गेले, असा दावा मंगळवारी रोहित पवारांनी केला होता.
advertisement
अजित पवारांनी शेवटची सही कोणत्या फाईलवर केली याची माहिती न्यूज 18 मराठीच्या हाती आली आहे. भंडारा-गोंदियातील राईस मिलच्या फाईलवर अजित पवारांनी शेवटची सही केली, अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे. या फाईलवर सही करण्यासाठी अजित पवार हे मुंबईत उशिरापर्यंत थांबले होते, आता या फाईलीवर अजितदादांना सही करण्यासााठी का थांबवण्यात आलं होतं, याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
रोहित पवारांनी काय केला होता आरोप?
२७ जानेवारी रोजी वेळापत्रकानुसार, अजितदादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्यात येणार होते. ताफा देखील लागला होता. पण दादा निघाले नाहीत. पण गाडीने जाऊ शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं विमान २७ तारखेला बूक केलं होतं. अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भाच्या त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी आग्रह केला होता. हा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. हे जर तपासायचं असेल तर दादांचा मोबाईल चेक करा, लँडलाईन फोन चेक करा. त्या फाईलीवर सही करायची होती, दादा कोणतीही फाईल रिकामी ठेवत नव्हते. एक मोठा नेता बोलत असेल तर दादांनी फाईलीवर सही केली. त्यामुळे वेळ गेला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे' अशी मागणी रोहित पवारांनी केली होती.
