सध्या रेल्वे प्रशासनाकडून 'शून्य भंगार' अशी मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेच्या आधारे न वापरत असलेल्या गोष्टींची विक्री करत रेल्वे आता मालामाल झालेली आहे. मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट झालेल्या सर्वच रेल्वे स्थानकांवरही मोहिम राबवली जात आहे. मुंबईसह अनेक रेल्वे स्थानकांवरील भंगार विक्रीस काढले आहे. 2024- 25 या वर्षी मध्य रेल्वेने भंगाराच्या माध्यमातून 393.65 कोटींची कमाई केलेली होती. ही कमाई यावर्षी 404.72 कोटींपर्यंत गेली आहे. 2.81 टक्क्यांनी ह्या कमाईमध्ये वाढ झाली आहे. मुख्य स्टेशनजवळील वर्कशॉप, रेल्वे यार्ड्स आणि अनुपयोगी साठलेले साहित्य यांची विल्हेवाट लावली जात आहे.
advertisement
निकामी आणि वापरात नसलेल्या साहित्यांचे वर्गीकरण करून त्याचे रूपांतर भंगार विक्रीत करण्यात आले. अनेक वर्कशॉपमधील अनुपयोगी वस्तुंची विक्री भंगारमध्ये करण्यात आली आहे. या माध्यमातून एक प्रकारे रेल्वेच्या महसूल वाढीला हातभार लागला आहे. 40, 177 मॅट्रिक टन रेल्वे मार्ग साहित्य, 2,55, 318 स्लीपर (पटरी तळमांड), 25, 790 (मॅट्रिक टन लोखंडी भंगार), 3325 (मॅट्रिक टन अलोखंडी भंगार), 47 रेल्वे इंजिन, 70 प्रवासी डब्बे आणि 110 मालवाहू डब्बे इतके अनुपयोगी साहित्य रेल्वेने विकले आहेत. मध्य रेल्वेने अनुपयोगी वस्तुंना विकत उत्तम रित्या महसूल प्राप्त केला आहे. सध्या रेल्वेच्या या महसूलाची सर्वत्र जोरदार चर्चा होते.
रेल्वेने विकलेल्या या सर्व गोष्टींमधून भंगार व्यवस्थापनाचे प्रमाण, ट्रॅक नूतनीकरणाची कामे आणि अनुपयोगी मालमत्तेचे आर्थिक रूपांतर व्यापक पद्धतीने होत आहे. मध्य रेल्वेच्या विभागनिहाय पातळीमध्ये सर्व विभागांमध्ये सर्वाधिक कमाई भुसावळ विभागाने केली आहे. त्यांनी तब्बल 97.72 कोटींची कमाई केलीये.
