कांदिवलीचा 'दीक्षित' ठरला बळी
मूळचा दीवचा असलेला २५ वर्षीय दीक्षित सोलंकी काही काळापूर्वी व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाला होता. तो मुंबईतील कांदिवली भागात वास्तव्यास होता. ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून ५२ नॉटिकल मैलांवर 'MKD Vyom' या ऑईल टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने धडक दिली. या भीषण स्फोटात टँकरच्या इंजिन रूमला आग लागली आणि त्यात दीक्षितचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
दीक्षित हा दीवमधील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सोलंकी यांचा धाकटा मुलगा होता. महिनाभरापूर्वीच आईच्या निधनानंतर तो गावी आला होता आणि पुन्हा कर्तव्यावर परतला होता, मात्र काळाने त्याच्यावर झडप घातली.
इतर दोन भारतीयही बेपत्ता
दुसऱ्या एका घटनेत, 'MV Skylight' या जहाजावर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत हल्ला झाला. यामध्ये बिहारचा आशिष कुमार आणि राजस्थानचा दलीप सिंग हे दोन भारतीय गेल्या ४८ तासांपासून बेपत्ता आहेत. शोधमोहीम सुरू असली तरी त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारतीय दूतावासाकडून दुःख व्यक्त
ओमानमधील भारतीय दूतावासाने दीक्षित सोलंकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. टँकरवरील इतर २५ क्रू मेंबर्सची (ज्यात १६ भारतीय होते) सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
