मनसेच्या आक्रामक भुमिकेनंतर मध्य रेल्वेने पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली होती. या बैठकीत दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन दिव्यातून सोडण्या मागची काय कारणे सांगितली आहेत? हे जाणून घेऊयात.
"आज मध्य रेल्वेमध्ये मनसेच्या प्रतिनिधींसोबत एक बैठक झाली. या बैठकीदरम्यान, रेल्वेने तीन मुख्य मुद्दे मांडले आहेत. पहिला मुद्दा दादर-रत्नागिरी ट्रेनच्या स्थलांतरासंदर्भात आहे.ही ट्रेन 2021 मध्ये दादरहून रत्नागिरीला हलवण्यात आली होती. कोविड-19 नंतर जेव्हा रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली, तेव्हा ही ट्रेन दादरहून दिवा येथे हलवण्यात आली,अशी माहिती सूरूवातीला मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) डॉ. स्वप्निल धनराज नीला यांनी दिली.
advertisement
पण दादरवरून ही गाडी दिव्यात का हलवली?यामागचं कारण सांगतात ते म्हणाले, जेव्हा ही ट्रेन दिवा स्टेशन ओलांडते,तेव्हा ती 5व्या आणि 6व्या लाईनला जोडली जाते. जो उपनगरीय सेवांच्या सायंकाळच्या गर्दीचा काळ असतो. या क्रॉसओव्हरमधून जाण्यासाठी ट्रेनला अंदाजे 11-12 मिनिटे लागतात, ज्यामुळे दोन्ही बाजूंच्या उपनगरीय गाड्यांच्या वेळेवर पोहोचण्यावर लक्षणीय परिणाम होतो.त्यामुळे यावर तोडगा म्हणून ही गाडी दिव्यात हलवण्याचा निर्णय़ घेण्यात आला. त्यामुळे 2021 मध्ये दादरऐवजी दिवा ते रत्नागिरीपर्यंत सेवा चालवण्याचा सावधगिरीचा निर्णय घेण्यात आला,असे डॉ. स्वप्निल धनराज नीला यांनी सांगितले.
"दादर-गोरखपूर ट्रेनबाबतही माहिती देण्यात आली. पूर्वी ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून धावत असे. जेव्हा LTT चे LHB-आधारित कोचिंग डेपोमध्ये रूपांतर झाले, तेव्हा ही सेवा दादरला हलवण्यात आली. दादरमध्ये ही सोय करण्यासाठी, डब्यांची संख्या 22 वरून 17 पर्यंत कमी करावी लागली. तिच्या संचालन, वारंवारता किंवा थांब्यांमध्ये इतर कोणताही बदल झालेला नाही; फरक फक्त एवढाच आहे की, जी ट्रेन पूर्वी 'मागणीनुसार' धावत होती, ती आता नियमित सेवा बनली आहे, असे देखील त्याने सांगितले.
कोकणासाठी दररोज 21 गाड्या धावतात
गेल्या आठवड्यात 14 गाड्या नियमित करण्यात आल्या, त्यापैकी 7 गाड्या महाराष्ट्रातील विविध शहरांना सेवा देतात. गेल्या 3-4 वर्षांत या प्रदेशात एकही ट्रेन रद्द झालेली नाही.याशिवाय, मडगावसाठी अनेक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत किंवा सुधारण्यात आल्या आहेत. 28 जून 2023 रोजी सीएसएमटी (CSMT) ते मडगाव नियमित सेवा सुरू झाली. २०२४ मध्ये वांद्रे टर्मिनसवरून आठवड्यातून दोनदा विशेष गाडी सुरू करण्यात आली,आणि नोव्हेंबर 2022 मध्ये एलटीटी-मडगाव ट्रेनची वारंवारता साप्ताहिकवरून आठवड्यातून 4 वेळा वाढवण्यात आली. सध्या, मुंबईहून कोकण विभागासाठी दररोज 21 गाड्या धावतात आणि इतर 25 गाड्या इतर स्थानकांवरून जातात. तसेच गेल्या वर्षभरात,मध्य रेल्वेने कोकण विभागासाठी 302 गणपती विशेष गाड्या, 52 उन्हाळी विशेष आणि 26 होळी विशेष गाड्या देखील चालवल्या आहेत, अशी माहिती देखील दिली.
