मुंबई : उत्तर मध्य मुंबईतून आशिष शेलार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पूनम महाजन यांच्या ऐवजी आशिष शेलार निवडणुकीला उभं राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. या जागेवर शेलारांनीच निवडणूक लढवावी यावर दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेतेही आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलारांना ही जागा मिळणार का? याकडे लक्ष लागलंय.
advertisement
महायुतीच्या जागावाटपात ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावरून बैठकांचं सत्र सुरू आहे. मात्र उत्तर मध्य मुंबई मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं दावा केलेला नाही. इतकंच नव्हे तर भाजपनं ही जागा सलग दोनदा जिंकलेली असूनही तिथला उमेदवार जाहीर झालेला नाही.
जागावाटपाच्या तुफान गोंधळात उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ पुरता अपवाद ठरला. कारण राज्यातला हाच एकमेव मतदारसंघ असा आहे की, जो शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी मागितलेला नाही. मात्र भाजपनं अजूनही या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केलेली नाही. सलग दोन वेळा निवडून आलेल्या विद्यमान खासदार पुनम महाजन यांच्या विरोधातलं वातावरण, वरिष्ठांची नाराजी आणि पक्षांतर्गत वादामुळं त्यांच तिकीट कापलं जाणार हे निश्चित मानलं जातंय. या मतदारसंघाचं पालकत्व असणाऱ्या आशिष शेलारांकडे लोकसभेचा उमेदवार शोधायची जबाबदारी आलीय. परिणामी माधुरी दीक्षित, रविना टंडन, अनुराधा पौडवाल यांच्यापासून ते इतर पक्षात शोधाशोध करूनही तोडीचा उमेदवार भाजपला मिळालेला नाही.
उमेदवाराची शोधाशोध करणाऱ्या आशिष शेलारांनाच दिल्लीश्वरांनी उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरलाय. उत्तर मध्य मुंबईत साडेचार ते पाच लाख ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांची संख्या आहे. यातच आता ठाकरे गट मविआत असल्यानं नसीम खान यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपसाठी ही जागा नक्कीच सोपी राहणार नाही. भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात असणारा ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदार हा आशिष शेलारांनी मेहनतीचं कायम स्वत:कडे ठेवला होता. त्याच कारणामुळे वरिष्ठ नेते आशिष शेलारांनी लढावं यासाठी आग्रही आहेत. मात्र आशिष शेलारच लोकसभेसाठी इच्छुक नसल्यानं उमेदवारीच्या निर्णयाला विलंब होतोय.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची 40 टक्के मतं पूनम महाजन यांना मिळाली होती. पण आता राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळेच भाजपही बदल करण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसून येतं.