मुंबईतील वडाळा प्रादेशिक परिवहन विभाग सध्या शहरामध्ये प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहे. आतापर्यंत वडाळा आरटीओने दोषी आढळलेल्या दोन हजाराहून अधिक वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून एकूण लाखो रूपयांचा दंड वसूल केला आहे. तर इतर दोषी वाहनचालकांवरही आरटीओ सध्या कारवाई करत आहे.
शहरामधील वाढते प्रदूषण लक्षात घेता वडाळा आरटीओने १ जानेवारी २०२५ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान आठ हजार ६५० वाहनांची पीयूसी तपासली. यातील दोन हजारहून अधिक वाहनांवर आरटीओने कारवाईचा बडगा उचलला आहे. यातून आरटीओने २१ लाख ५७ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. आरटीओकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये कारवाईवेळी ज्या वाहनधारकांनी पीयूसी सर्टिफिकेट दाखवले नाही, त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यासोबतच ज्यांचे वाहन मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये वायू प्रदूषण करत होते. त्यांच्यावरही आरटीओने कारवाई केली आहे. जर तुमच्याही दुचाकीची किंवा चारचाकीची पीयूसी नसेल तर आत्ताच ती काढून घ्या. अन्यथा तुमच्यावरही आरटीओकडून कारवाई करण्यात येईल.
advertisement
जर तुम्हाला सुद्धा या कायदेशीर कचाट्यातून वाचायचं असेल, तर सर्वात आधी आपल्या वाहनाचे सर्व कागदपत्र काढून ठेवा. शिवाय जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर कायम हेल्मेटचा वापर करा आणि चारचाकी चालवत असाल तर, सीटबेल्टचा वापर करत राहा. आपण नियमांनुसार राहिल्यास आपल्यावर आरटीओकडून कारवाई होणार नाही. वेळोवेळी आरटीओकडून कार्यालयांकडून वाहनांचे कागदपत्रे, इन्शुरन्स, वाहनाचा वैध परवाना, फिटनेस, प्रदूषण नियंत्रण सर्टिफिकेट - PUC अशा कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
