मुंबईतल्या गोवंडीतील शिवाजी नगर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नवरदेवानेच नवरीचे लग्नासाठी तयार केलेले दागिने हिऱ्यांनी सजवण्याच्या बहाण्याने घेत दागिने पळवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. नवरदेवाने नवरीचे थोडे थाडके नाही तर, तब्बल अडीच लाख रूपयांचे दागिने घेऊन पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर लगेचच त्या तरूणीने शिवाजी नगर पोलीस स्थानकात जाऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरूणीने पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
advertisement
त्या तरूण- तरूणीची एकमेकांसोबत काही महिन्यांपूर्वी एका मेट्रिमोनियल वेबसाईटवरून भेट झाली होती. त्या आधी त्यांनी एकमेकांची वैयक्तिक माहिती त्या वेबसाईटवर अपलोड केलेली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी नबील खान नावाच्या तरूणाने त्या तरूणीला त्यावर मेसेज पाठवला. मग त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत मोबाईल नंबर सुद्धा शेअर केला होता. नंबर शेअर केल्यानंतर काही दिवस एकमेकांशी बोलले आणि एकमेकांसोबत बोलल्यानंतर त्यांचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर त्यांचा एकमेकांसोबत भेटण्याचा संपर्क वाढला. नबीलने त्या तरूणीला लग्नासाठीचे दागिने हिऱ्यांनी मढवून घेऊया, असं सांगितलं आणि तिच्याकडून दागिने घेत पोबारा केला.
हिरे लावून देण्याच्या बहाण्याने दागिने घेतल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी त्या तरूणीने त्याला फोन करून संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. तिने तब्बल दोन दिवस त्याच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. त्या तरूणाचा फोन बंद लागत असल्यामुळे त्या तरूणीने थेट शिवाजी नगर पोलीस स्थानक गाठलं. तिने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
