कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लाखो चाकरमानी या काळात मुंबईतून कोकणात जात असतात. यंदा अनेकांनी रोरो बोटीने मुंबईहून मालवणला जाण्याचा बेत आखला होता. मात्र, हा प्लॅन या वर्षी फिसकटण्याची चिन्हे आहेत. गणेशोत्सवापर्यंत ही सेवा सुरू करण्याचा सरकारचा मानस होता. परंतु, प्रवासी बोटीसाठी जेट्टी उभारण्याची गरज असून जेट्टी तयार झाल्यावरच प्रवासी बोटसेवा सुरू होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
advertisement
Mumbai Tourism: मुंबईत हे नाही पाहिलं, तर पाहिलं काय? पावसाळी पर्यटनासाठी 5 बेस्ट ठिकाणं!
जेट्टीच तयार नाहीत
मुंबईतील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस येथून रोरो सेवेच्या माध्यमातून अवघ्या साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग, तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. परंतु, यंदाच्या गणेशोत्सवापासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. रत्नागिरीला अद्याप जेट्टी तयार करण्यात आलेली नाही. तर जयगडमध्ये जेट्टी असली तरीही तिथे रोरोची बोट लागण्यासाठी अतिरिक्त सुविधा करावी लागणार आहे. गणेशोत्सवापूर्वी अशा सुविधा उपलब्ध करणे अशक्य आहे.
कशी आहे रोरो बोट?
रोरो एम2एम या कंपनीची हायटेक बोट असून ती एखाद्या क्रुझप्रमाणे आहे. तिची किंमत जवळपास 55 कोटी रुपये इतकी आहे. या अत्याधुनिक बोटीत 500 प्रवासी आणि 150 वाहने ठेवण्याची क्षमता आहे. बोटीचा वेग हा 24 नॉटिकल मैल इतका असणार आहे. त्यामुळे मुंबई ते मालवण अंतर अवघ्या 4 तासांत पार करता येणार आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने कोकणात जाण्यासाठी लागणाऱ्या 10 ते 12 तासांच्या तुलनेत अर्ध्याहून कमी वेळ लागणार आहे.
दरम्यान, रोरो बोटीच्या चाचण्या केवळ मुंबई ते मांडवा या जलवाहतूक मार्गावर झाल्या आहेत. मुंबईतील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते मांडवा चाचणी झाली आहे. येत्या काही दिवसांत या बोटीच्या मालवण, रत्नागिरी, विजयदुर्ग दरम्यान चाचण्या घेण्यात येतील. त्यानतर बोट चालवण्याचा परवाना मिळणार असल्याचे एम2एम व्यवस्थापनाने सांगितले.