सध्याची पाणीसाठ्याची स्थिती
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांमध्ये सध्या मिळून सरासरी 37.70 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा साठा जास्त असला तरी उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे हा साठा जुलै अखेरपर्यंत पुरेल का, यासाठी पालिका प्रशासनाला योग्य नियोजन करावे लागणार आहे.
advertisement
प्रत्येक धरणातील पाणीसाठा वेगवेगळा आहे. ऊर्ध्व वैतरणा धरणात 40.35 टक्के, मोडकसागरमध्ये 34.55 टक्के, तानसा धरणात 31.97 टक्के, मध्य वैतरणात 39.96 टक्के, भातसा धरणात 37.13 टक्के, विहार धरणात 58 टक्के तर तुळशी धरणात 43.57 टक्के पाणीसाठा आहे.
या सातही धरणांमधून दररोज सुमारे 4000 दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना पुरवले जाते. या धरणांची एकूण पाणीसाठवण्याची क्षमता 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. पण सध्या फक्त 5 लाख 45 हजार 680 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे, म्हणजेच निम्म्याहून कमी साठा शिल्लक आहे. उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढत असल्याने येत्या काही दिवसांत पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणे खूप गरजेचे झाले आहे. यासाठी पालिकेने नागरिकांना पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पाणीगळती आणि दूषित पाण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी आढावा बैठक घेतली. त्यांनी गळतीच्या तक्रारी तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. तसेच पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सर्व विभागांची बैठक घेऊन पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. महापौर रितू तावडे यांनीही पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी जलसाठ्याचे योग्य नियोजन आणि पर्यायी उपाययोजना करण्यावर भर दिला आहे.






