मुंबई : कर्जत-पनवेल रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाल आता स्थानिक खंडणीखोरांच्या रडावर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे प्रकल्पाचे काम करत असलेल्या साईट इंजिनियरला दोन लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या किरवली येथील पाच जणांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे विकासकामांत अडथळा निर्माण करणाऱ्या खंडणीखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि ठेकेदार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. प्रकल्पाचे साईट इंजिनियर प्रदीप विश्वास हे किरवली येथील टनेल (बोगदा) परिसरात कामावर देखरेख करत असताना किरवली गावातील पाच तरुण तिथे आले. त्यांनी इंजिनियर विश्वास यांना कामाच्या ठिकाणी अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
दोन लाखांची खंडणीची मागणी
आरोपींनी या जमिनी आमच्या आहेत, इथे काम करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असा पवित्रा घेतला. त्यांनी इंजिनिअरकडे दोन लाखांचा मासिक हप्ता (खंडणी) किंवा 10 गाड्या दगड देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य न केल्यास काम बंद पाडण्याची आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या इंजिनियरने तातडीने रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदाराला याची माहिती दिली.
कर्जत पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल
रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सापळा रचून विशाल गायकवाड, विनोद बडेकर, प्रितेश भोईर, मयुर गायकवाड आणि अविनाश बडेकर या पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर खंडणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत रेल्वे हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प असून त्यात अशा प्रकारे अडथळा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
