19 फेब्रुवारीपासून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून पश्चिम रेल्वेवर उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये एक एसी लोकल आणि तीन साध्या लोकल अशा चार नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. 11 सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. उन्हाचे वाढते तापमान लक्षात घेता रेल्वेकडून प्रवाशांच्या सेवेमध्ये एसी लोकल आणली गेली आहे. आत्ताच उन्हाची कलही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्या दृष्टीने रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. 12 अतिरिक्त एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार असून 3 सामान्य लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.
advertisement
यापूर्वी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या एकूण फेऱ्या 121 होत्या ज्या आता 133 एकूण फेऱ्या होणार आहेत. तर, पश्चिम रेल्वेवर एकूण 1410 लोकल फेऱ्या होत्या. ज्यांची संख्या 1414 पर्यंत पोहोचली आहे. खरंतर, शनिवार- रविवार अनेक नोकरदारांना सुट्टी असते. त्यामुळे त्या दिवशी अनेक एसी लोकल रद्द केल्या जातात. शनिवार आणि रविवारी चालणाऱ्या एसी सेवांची संख्या 77 वरून 106 पर्यंत लक्षणीयरीत्या वाढवली गेली आहे. ज्यामुळे विकेंडच्यावेळी घरातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सोयीस्कर प्रवास होईल. या व्यतिरिक्त, सध्या भाईंदर ते वांद्रे अशी धावणारी धीमी लोकल आता विरारहून धावेल, ज्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त सुविधा आणि सुधारित कनेक्टिव्हिटी मिळेल.
