नीळकंठ रोडवरील धांधला पानी येथे एका विवाहित महिलेची हत्या झाली होती. त्याबाबत पोलिसांनी मंगळवारी (28 मे) खुलासा केला. विवाहबाह्य संबंधांवरूनच ही हत्या झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय. त्यामागे प्रियकराची पत्नी, बहीण व एका तरुणाचा हात असल्याचाही खुलासा पोलिसांनी केलाय. त्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात सादर केलं. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement
पोलिसांना धांधला पानी इथं 25 मे रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला असं एसएसपी पौडी लोकेश्वर सिंह यांनी सांगितलंय. त्या महिलेच्या गळ्यावर काही खुणा दिसल्या. त्यामुळे हत्या व पुरावे लपवण्याच्या आरोपाखाली एसआय लक्ष्मण सिंह कुंवर यांनी अज्ञातांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, जानकी सेतू या ठिकाणी घटना घडण्याच्या आधी महिला काही लोकांसोबत दिसल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळून आलं.
मृत महिला झारखंडमधील करमपूर येथील अनिता देवी असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. झारखंडमधीलच ममता, बबिता देवी आणि हरियाणाच्या गुडगावमधील निवासी ओमवीर हे तिघं आरोपी असून त्यांना अटक करण्यात आलीय. बबिताचा नवरा रंजितशी अनिताचे अनैतिक संबंध असल्याचं चौकशीत उघड झालं. विवाहित महिलेशी अनैतिक संबंधांमुळे रंजित त्याची पत्नी व बहिणीला मारहाण करत असे. ममता देवी हिचे ओमवीरशी संबंध होते. त्यामुळे तिघांनी मिळून अनिता देवी हिला मारण्याचा कट बनवला.
वाचा - त्याने पत्र्याच्या शेडमध्ये ऑफिस थाटलं अन् 400 कोटी घेऊन पळाला, नगरमधील घटना
ममता गुडगावमध्ये घरी जाऊन स्वयंपाक करण्याचं काम करते. ओमवीर त्याच गावात ड्रायव्हरची नोकरी करत होता. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. ममतानं ओमवीरला सगळी माहिती दिली व वहिनीला सोबत घेऊन अनिताच्या हत्येचा कट केला. ममतानं भाऊ रंजित, वहिनी बबिता, अनिता व मुलं यांना गुडगावला बोलावलं. नीळकंठ धामच्या दर्शनाचा प्लॅन केला आणि मग अनिताला मारलं, असा पोलिसांनी दावा केला आहे.
पोलिसांनी तपासात कार व एक दुपट्टा जप्त केलाय. 25 मे रोजीच पोलिसांना मृतदेह मिळाला होता. त्यावरून पोलिसांनी त्याच दिवशी स्वतः तक्रार दाखल केली, मात्र त्याची माहिती पोलिसांनी एक दिवस उशीरा जाहीर केली. 27 मे रोजी पोलिसांनी सोशल मीडियातून हत्येबाबत माहिती जाहीर केली. ही हत्या असून पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पोलिसांना संशय आला. मृत महिलेच्या गळ्यावर आढळलेल्या खुणांवरून संशय येऊन पोलिसांनी तपास केला व आरोपींना अटक केली.